तुमच्या ‘या’ सवयीच सांगतील जन्मकुंडलीतील ग्रहदोष! कसे? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 10:42 AM2022-01-18T10:42:45+5:302022-01-18T10:47:29+5:30

ज्योतिषशास्त्रानुसार, आपल्या सवयींवरून आपल्या कुंडलीतील ग्रहदोषाचा अंदाज लावता येऊ शकतो. पाहा, डिटेल्स...

एखाद्या व्यक्तीला अनेक सवयी असतात. आपल्या बोलण्यातून, वागण्यातून त्या सवयी दिसत असतात. काही सवयी या चांगल्या असतात. तर काही सवयी वाईट असतात. चांगल्या सवयींचे कौतुक केले जाते, त्या आचरण्याचा सल्ला दिला जातो, तर काही वेळा त्या आदर्श मानल्या जातात. दुसरीकडे वाईट सवयी टाळण्याचा सल्ला दिला जातो.

माणसाला होत असलेला फायदा, लाभ, नुकसान, संस्कृती, परंपरा, प्रथा, चालिरिती, सामाजिक तत्त्व, विचार, आचार अशा काही परिमाणांवरून एखादी सवय चांगली किंवा वाईट ठरत असते. कोणतीही सवय काम राहतेच, असे नाही. काळानुरूप त्यात बदल होत असतात. किंबहुना चांगल्या, वाईटच्या ठोकताळ्याप्रमाणे माणूस त्या बदलत असतो.

काही सवयींमुळे आपल्याला फायदा होत असतो, तर काही सवयींमुळे तोटा होतो. काही सवयी समाजासाठी चांगल्या असतात, तर काही सवयी समाजविघातक ठरू शकतात. कौटुंबिक आणि सामाजिक सवयींवरून आपले व्यक्तिमत्त्व पडताळले जात असते. मात्र, आपल्या सवयींवरून आपल्या कुंडलीतील ग्रहदोषाचा आपल्याला अंदाज लावता येऊ शकतो. ज्योतिषशास्त्रात याबाबत सांगण्यात आले आहे, चला तर मग जाणून घेऊया...

सवयी बदलल्यामुळे काही गोष्टी साध्य होऊ शकतात, त्याचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो, यावर ज्योतिषशास्त्रही भर देते. काही सवयी माणसे स्वतःला लावून घेत असतात, तर काही सवयी कुंडलीतील ग्रहांमुळे आपोआप माणसाला जडत असतात, असे सांगितले जाते. मात्र, याकडे योग्य प्रकारे लक्ष दिल्यास, त्यात सुधारणा केल्यास आपल्याला सकारात्मक फायदा मिळू शकतो, असे मानले जाते.

काही जणांना डोके खाजवण्याची सवय असते. अशी सवय शक्य तितक्या लवकर बदलण्याचा सल्ला दिला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, अशी सवय केतू ग्रहाची दशा असल्याचे संकेत देते. केतू ग्रहाच्या दशेमुळे न्यायालयीन खटले, विनाकारण वादविवाद, दाम्पत्य जीवनातील वाढत्या कुरबुरी, असाध्य रोगांच्या समस्या निर्माण होऊ शकतात. यावर उपाय करण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन कृती करावी. अनेकदा केतू ग्रहाची शांती करण्याचा सल्ला दिला जातो.

अनेकांना येता-जाता काही ना काही खाण्याची सवय असते. काही जण व्यवस्थापन करून त्या त्या वेळीच खातात. मात्र, अचानक वेळी-अवेळी खाण्याची सवय लागली, तर सावध व्हावे लागेल. ज्योतिषशास्त्रानुसार, शनी आणि बुध ग्रहाचे अशुभ संकेत यातून मिळतात, असे सांगितले जाते.

शनी आणि बुध ग्रहाच्या दशेमुळे त्वचासंबंधीचे रोग/आजार, उद्योग, व्यवसायात नुकसान, खोटे दोषारोप, नातेसंबंधातील दुरावा यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. यावर उपाय करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे हितकारक ठरेल.

दोन व्यक्ती संभाषण करत असताना तिसऱ्या व्यक्तीने मधे-मधे बोलू नये, असा संकेत असतो. मात्र, काही जणांना मधे-मधे बोलण्याची सवय असते. ही सवय वाईट मानली जाते आणि ती बदलण्याची सल्ला प्रामुख्याने दिला जातो.

ज्योतिषशास्त्रानुसार, या सवयीवरून चंद्र ग्रहाची दशा असल्याचा संकेत मिळतो. चंद्र ग्रहाच्या दशेमुळे झोप न येणे, विचारांवर नियंत्रण नसते. ज्योतिषशास्त्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊन यावर उपाय केला जाऊ शकतो, असे सांगण्यात येते.

काही व्यक्तींना अनेक गोष्टींची माहिती असते. मात्र, ऐनवेळी त्यांना त्या लक्षात येत नाही. काही वेळेस विसरायला होते. अनेकांना विस्मरणाची सवय असते. वास्तविक विस्मरण हे सवयीमध्ये समाविष्ट करता येईल, असे नाही. मात्र, वारंवार किंवा नियमितपणे होत असल्यास त्याला विस्मरणाची सवय मानता येऊ शकते. एखादी गोष्ट माहिती असते. मात्र, नेमक्यावेळी आठवत नाही.

ज्योतिषशास्त्रानुसार, विस्मरणाची सवय शुक्र ग्रहदोषाचा संकेत देते. यामुळे यौन समस्या, कामेच्छा समाप्ती, पायदुखी, आतड्यांसंदर्भातील समस्या उद्भवू शकतात. यावर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाप्रमाणे कृती करावी, असा सल्ला दिला जातो.

आपल्या सवयींचे परिणाम आपल्या मनावर, विचारांवर, आरोग्यावर होत असतात. सदर माहिती ज्योतिषीय मान्यतांवर आधारित आहे. त्यामुळे योग्य ज्योतिषी सल्ला घ्यावा, असे सांगितले जाते. जन्मकुंडलीचा अभ्यास करून एखाद्या व्यक्तीच्या स्वभाव, सवयी, समस्यांवरील सल्ले दिले जातात.