कपाशीचे भाव कोसळले; शेतकरी संकटात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 08:41 PM2019-01-20T20:41:03+5:302019-01-20T20:41:21+5:30
परिसरात नोव्हेंबर महिन्यात सहा हजारांच्या घरात पोहोचलेला कापूस संक्रांतीनंतर मात्र चार हजार आठशे रुपये प्रति क्लिंटलपर्यंत खाली आल्याने दुष्काळी शेतक-यांवर संकट कोसळले आहे.
लाडसावंगी (जि. औरंगाबाद) : परिसरात नोव्हेंबर महिन्यात सहा हजारांच्या घरात पोहोचलेला कापूस संक्रांतीनंतर मात्र चार हजार आठशे रुपये प्रति क्लिंटलपर्यंत खाली आल्याने दुष्काळी शेतक-यांवर संकट कोसळले आहे. यामुळे ऐन लग्नसराईत मुला-मुलींचे लग्न पुढे ढकलण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे.
लाडसावंगी परिसरात यंदा जेमतेम पाऊस झाला आहे. यामुळे खरीप पिकावर शेतक-यांनी केलेला खर्चही निघाला नाही. पुरेसा पाऊस नसल्याने २०१२ नंतर पुन्हा यंदा दुष्काळाचे तोंड शेतक-यांना पाहावे लागत आहे. त्यातच रबीचे पीक ही पाण्याअभावी शेतक-यांना घेता आले नाही. जेमतेम झालेल्या पावसावर आलेल्या कापसाला शेतक-याने मकर संक्रांतीनंतर विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे शेतक-यांनी आतापर्यंत कापूस जपून ठेवला होता. मात्र, संक्रांत होऊन पाच दिवस झाले तरी कापसाचे भाव वाढले नाहीत, उलट सहाशे ते आठशे रुपयांने कमी झाले आहेत. यामुळे बळीराजा पार संकटात सापडला असून, यंदाच्या वर्षी पकडलेली मुला-मुलींची लग्न पुढे ढकलण्याची वेळ बळीराजावर आली आहे.
व्यापा-यांकडून शेतक-यांची लूट
शासनाने कापूस खरेदी केंद्र सुरू केलेली नसल्याने व्यापारी संगनमत करून शेतक-यांना लुटत आहेत. व्यापारी कापूस खराब असल्याचे सांगत शेतक-यांकडून कमी दराने कापसाची खरेदी करीत आहेत. त्यातच शेतमालासाठी उसने घेतलेले पैसे परत वसुलीसाठी दुकानदार, सावकार तगादा लावत आहेत. यामुळे बळीराजाला कापूस विकण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने शेतकरी आहे त्या भावात कापसाची विक्री करीत आहेत.
घरात पैसा नाही, कापसाला भाव नाही
शेतक-यांना कापसाचे उत्पादन म्हणजे नगदी पीक समजले जाते. कापूस विकून झालेल्या उत्पादनातून मुला-मुलींचे लग्न दिवाळीनंतर जुळवाजुळव करून फेब्रुवारी ते मे महिन्यात उरकून घेतली जातात; परंतु घरात पैसा नाही, कापसाला भाव नाही. यामुळे मुला-मुलींचे लग्न सोहळे पुढील वर्षापर्यंत ढकलण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे.