शिक्षकांनी धरले संस्थेला वेठीस !
By Admin | Published: January 9, 2015 12:18 AM2015-01-09T00:18:24+5:302015-01-09T00:52:01+5:30
बीड : येथील राजे संभाजी बहूउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या रुख्माई- गोविंद मुकबधिर व मतिमंद संस्थेविरुद्ध उपोषण करणारे शिक्षक अनाधिकृतरित्या गैरहजर असून व्यवस्थापन कोलमडले आहे
बीड : येथील राजे संभाजी बहूउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या रुख्माई- गोविंद मुकबधिर व मतिमंद संस्थेविरुद्ध उपोषण करणारे शिक्षक अनाधिकृतरित्या गैरहजर असून व्यवस्थापन कोलमडले आहे. रोजंदारी कर्मचारी नेमण्याची वेळ संस्थेवर आली आहे. दरम्यान, चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी समिती नेमली आहे.
रुख्माईगोविंद मतिमंद विद्यालयातील ९ तर मुकबधिर विद्यालयातील १२ कर्मचारी १ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. यामध्ये शिक्षक, काळजीवाहक व लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
मात्र, उपोषणाला बसण्यापूर्वी या कर्मचाऱ्यांनी संस्थेला कळविले नाही. शिवाय अनाधिकृतपणे गैरहजर राहिल्याने संस्थेच्या व्यवस्थापनावर परिणाम झाल्याचा दावा संस्था सचिव शिवाजी चव्हाण यांनी केला होता. त्याचबरोबर संस्थेने गैरहजर २१ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावून खुलासे मागविले आहेत. मात्र, अद्याप खुलासे आलेले नाहीत.
दरम्यान, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी सीईओ नामदेव ननावरे यांना संस्थेच्या चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार त्रयस्थ समिती नेमली आहे. उप शिक्षणाधिकारी हिरालाल कराड, विस्तार अधिकारी गौतम चोपडे, कक्षाधिकारी जयलाल राजपूत यांची समिती चौकशी करून अहवाल सीईओंपुढे ठेवणार आहे. (प्रतिनिधी)
रुख्माई- गोविंद मतिमंद व मुकबधिर विद्यालयाचे सचिव शिवाजी चव्हाण म्हणाले, २१ मार्च २०१४ रोजी तत्कालीन समाजकल्याण अधिकाऱ्यासह निरीक्षक व कर्मचाऱ्याची मी एसीबीकडे तक्रार केली होती. त्यांना एसीबीने रंगेहाथ पकडले होते. तेंव्हापासून संस्थेतील काहींना हाताशी धरुन अधिकाऱ्यांनी माझी अडवणूक सुरु केली आहे. कर्मचाऱ्यांत फूट पाडून सूड उगविण्याचा अधिकाऱ्यांचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला.
कर्मचारी व संस्था पदाधिकारी यांच्यातील वाद आहे. त्याच्याशी आमचा संबध नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी त्रयस्थ समितीमार्फत संस्थेची चौकशी करावी, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार सीईओंनी समिती नेमली आहे, असे जि. प. समाजकल्याण अधिकारी एस. एस. शेळके म्हणाले. कोणाची अडवणूक आम्ही करण्याचा प्रश्न येतो कोठे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.