ऑक्सिजन सिलिंडर पुरेसे नसताना लाेकार्पणाची घाई का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:34 AM2021-05-08T04:34:58+5:302021-05-08T04:34:58+5:30
तुळजापूर : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पुढाकारातून १२४ भक्त निवासात उभारण्यात आलेल्या काेविड रुग्णालयाचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या ...
तुळजापूर : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पुढाकारातून १२४ भक्त निवासात उभारण्यात आलेल्या काेविड रुग्णालयाचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते शुक्रवारी लाेकार्पण झाले. पुरेसे ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध नसताना लाेकार्पणाची घाई कशासाठी केली? असा सवाल पालिकेचे नगराध्यक्ष सचिन राेचकरी यांनी उपस्थित केला आहे.
तुळजापूर येथील १२४ भक्त निवासात रुग्णांची गरज ओळखून काेविड रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. यासाठी आमदार पाटील यांनी पुढाकार घेतला. उपजिल्हा रुग्णालयाकडे डॉक्टर्स कमी असल्याने तेरणा मेडिकल कॉलेजमधील डॉक्टर्सची सोय केली. परंतु, जिल्ह्यात ऑक्सिजन व सिलिंडर्सची कमतरता असल्यामुळे १२४ भक्त निवासातील ऑक्सिजन बेड सुरू झाले नव्हते. परंतु, शुक्रवारी केवळ प्रसिद्धीसाठी पुरेसे सिलिंडर व मुख्यतः पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध नसतानादेखील १२४ भक्त निवासमधील ऑक्सिजन जोडणी केलेल्या १४५ खाटांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी, तसेच जिल्हा शल्यचिकित्सक उपस्थित होते. १४५ रुग्णांच्या ऑक्सिजन बेडची साेय करण्यासाठी साधारणतः २०० सिलिंडर्सची आवश्यकता आहे. मात्र, केवळ १० सिलिंडर देऊन उद्घाटनाचा सोपस्कार उरकण्यात आला. दहापैकी पाच सिलिंडर तात्पुरत्या स्वरूपात उपजिल्हा रुग्णालयातून आणण्यात आले आहेत. त्यामुळे उपलब्ध सिलिंडरच्या माध्यमातून केवळ सात ते आठच रुग्णांना साैम्य प्रमाणात ऑक्सिजन मिळू शकताे. असे असतानाही पालकमंत्री गडाख यांनी लाेकार्पणाची घाई का केली? असा सवाल या निमित्ताने नगराध्यक्ष राेचकरी यांनी उपस्थित केला.