जिल्ह्यात दिलासा, पीक-पाणी सरासरीपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:18 AM2021-07-27T04:18:33+5:302021-07-27T04:18:33+5:30
जळगाव : यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत पाऊस कमीच असला तरी जिल्ह्यात पाऊस व पेरण्या सरासरीपेक्षा अधिक असल्याने जिल्ह्यासाठी ही ...
जळगाव : यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत पाऊस कमीच असला तरी जिल्ह्यात पाऊस व पेरण्या सरासरीपेक्षा अधिक असल्याने जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब मानली जात आहे. चोपडा वगळता सर्वच तालुक्यात समाधानकारक स्थिती असून जिल्ह्यात जून व जुलै महिन्याच्या सरासरी पावसाच्या तुलनेत ९१.५ टक्के पाऊस झाला आहे तर ८५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
जिल्ह्यातील पाऊस, पेरण्या यांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या उपस्थितीत सोमवारी बैठक झाली. या वेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक अनुपमा पाटील आदी उपस्थित होते.
प्रत्येक महिन्याच्या ५० टक्क्यांपर्यंत पाऊस झाल्यास समाधानकारक स्थिती मानली जाते. त्यानुसार जिल्ह्यातील चोपडा वगळता इतर १४ तालुक्यांची जून व जुलै महिन्याची टक्केवारी ६० टक्क्यांपासून १२६ टक्क्यांपर्यत पोहचली आहे. यात चोपडा तालुक्याची सरासरी ५८.१ टक्के असून ती काठावर मानली जात आहे. तसेच जिल्ह्यात पेरण्यादेखील ८५ टक्क्यांपर्यंत झाल्या असून पाऊस व पेरण्यांची स्थिती समाधानकारक आहे.