वाहनाने हूल दिली त्याच्या आयुष्याची दोरी तुटली;अपघातात एक ठार, दोन गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 01:38 PM2021-03-01T13:38:25+5:302021-03-01T13:40:45+5:30
दुचाकी आडूळ शिवारात बायपासवर येताच त्याच दिशेने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला हूल दिली.
आडूळ : भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला हूल दिल्याने दुचाकी घसरली. या अपघातात दुचाकीवरील एकजण ठार, तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी रात्री औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आडूळ शिवारात घडली.
चिकलठाणा येथील सोनू महादेव मगरे (वय २०), गणेश अशोक मगरे (२०) व ब्रिजवाडी येथील करण श्रीराम नरवडे (२३) हे रविवारी रात्री रजापूर गावाकडून औरंगाबाद शहराकडे दुचाकीने ट्रिपल सीट जात होते. त्यांची दुचाकी आडूळ शिवारात बायपासवर येताच त्याच दिशेने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला हूल दिली. यामुळे दुचाकी घसरून तिघेही खाली पडले. यात सोनू महादेव मगरे हा जागीच ठार झाला, तर गणेश मगरे व करण नरवडे हे दोघे गंभीर जखमी झाले आहे. जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात झाली आहे.