Coronavirus In Aurangabad : लॉकडाऊन काळात शहरात हजार कोटींचा व्यापार होणार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 08:04 PM2020-07-08T20:04:30+5:302020-07-08T20:06:47+5:30

कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे व्यवहार दोन वर्षे पाठीमागे गेल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

Coronavirus In Aurangabad : During the lockdown period, trade worth Rs One thousand will be closed | Coronavirus In Aurangabad : लॉकडाऊन काळात शहरात हजार कोटींचा व्यापार होणार ठप्प

Coronavirus In Aurangabad : लॉकडाऊन काळात शहरात हजार कोटींचा व्यापार होणार ठप्प

googlenewsNext
ठळक मुद्देकामगारांचे वेतन, वीज बिल, दुकान भाडे भरण्याचाही  निर्माण होईल प्रश्न पुन्हा लॉकडाऊनमुळे छोटे व्यापारी येणार अडचणीत  

औरंगाबाद : शहरात १० ते १८ जुलैदरम्यान शहरात पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याने या ९ दिवसांच्या काळात शहरातील व्यापाऱ्यांचा सुमारे  ८०० ते एक हजार कोटी रुपयांचा व्यापार ठप्प होणार आहे. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे व्यवहार दोन वर्षे पाठीमागे गेल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

शहरात किराणा दुकाने वगळता अन्य व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक छोटे व्यापारी दुकानांचे भाडेही भरू शकत नाहीत, अशी स्थिती आहे. अनलॉकमध्ये दुकाने सुरू झाली. मात्र, पी-वन, पी-टूच्या नियमांचा फटका बसला. या परिस्थितीतही व्यापारी आपला व्यवसाय चालविण्याचा प्रयत्न करीत असतानाच आता १० जुलैपासून पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याने त्याचा व्यापारी व्यवहारांवर मोठा परिणाम होणार आहे. कामगार, शेतकरी ते उद्योजकापर्यंत सर्वांना सवलती दिल्या गेल्या; पण व्यापाऱ्यांना सवलत जाहीर न झाल्याने त्यांच्यात  संताप व्यक्त करण्यात येत आहे. 
१८ जुलैनंतर व्यापार सुरळीत सुरू होण्यासाठी १५ दिवसांचा अवधी लागेल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे, तर काही व्यापाऱ्यांनी सांगितले की, मोठे व्यापारी तग धरून राहतील; पण लहान व्यापाऱ्यांना मात्र घरखर्च भागवणे कठीण जाणार आहे. बँकेचे कर्ज, दुकान भाडे, वीज बिल, कर्मचाऱ्यांचा पगार देणे कठीण जाईल. त्यांच्यासमोर मोठी आर्थिक समस्या निर्माण होईल. व्यापारी महसंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, बाजारपेठ बंद राहणार असल्याने ९ दिवसांत ८०० ते एक हजार कोटींची उलाढाल ठप्प राहील. 


व्यापारी संघटनांचे पदाधिकारी म्हणतात...
९ दिवसांच्या लॉकडाऊनचा पुढील १५ दिवस जाणवेल परिणाम

अनलॉकनंतर व्यवहार सुरळीत सुरू होण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागले. आता कुठे कार व दुचाकीची विक्री वाढू लागली होती; पण पुन्हा लॉकडाऊन सुरू होणार आहे. ९ दिवस व्यवहार बंद राहणार आहे. पुन्हा व्यवहार पूर्ववत सुरू होण्यासाठी १५ दिवस लागतील. महिन्याची एकूण उलाढाल ५० टक्क्यांनी कमी होणार आहे. 
- राहुल पगरिया, अध्यक्ष, चेंबर आॅफ अर्थोराईज आटोमोबाईल डीलर्स असोसिएशन

व्यापाऱ्यांचे नुकसान होणार; पण भविष्याचेही नियोजन व्हावे
मागील तीन महिन्यांच्या लॉकडाऊनमध्ये जिल्हा प्रशासनाने विलगीकरण कक्ष वाढवणे, व्हेंटिलेटरची व्यवस्था करणे, अपेक्षित होते. मात्र, नियोजन न झाल्याने त्याचा परिणाम शहरला भोगावा लागला, तसेच पोलिसांनी सुरुवातीच्या काळात कडक पाऊल उचलले नाही. या चुका टाळता आल्या असत्या; पण आता प्रशासनाला ९ दिवसांचा वेळ मिळत आहे. या काळात भविष्यातील वाढणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन नियोजन करावे. 
-लक्ष्मीनारायण राठी, महासचिव, जिल्हा व्यापारी महासंघ

मोंढा, जाधववाडीत ८० कोटींचे नुकसान
९ दिवसांत मोंढा व जाधववाडी धान्याची बाजारपेठ मिळून ७० ते ८० कोटींचे नुकसान होणार आहे. सर्व व्यापाऱ्यांनी परराज्यातील धान्याच्या आॅर्डरी रद्द करणे सुरू केले आहे. जे मालट्रक ९ तारखेच्या आत येतील त्यातील माल उतरवून घेण्यात येणार आहे. 
-नीलेश सेठी, अध्यक्ष, जनरल किराणा मर्चंट असोसिएशन


हॉटेल, लॉजिंग बंद असल्याने परिणाम नाहीच
हॉटेल, लॉजिंग बंदच आहे. आता सरकारने लॉजिंगला परवानगी दिली; पण विमानसेवा बंद, पर्यटनस्थळे बंद आहेत. कोरोनामुळे कोणी शहरात येण्यास तयार नाही. यामुळे पुन्हा लॉकडाऊन केले तरी हॉटेल, लॉजिंगवर विशेष परिणाम होणार नाही. 
- शिवाजी पाटील, अध्यक्ष, औरंगाबाद डिस्ट्रिक्ट हॉटेल, रेस्टॉरंट असोसिएशन

यापुढे लॉकडाऊन करणे परवडणार नाही
तीन महिन्यांच्या लॉकडाऊननंतरही आता पुन्हा ९ दिवसांचा लॉकडाऊन करावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे आम्ही व्यावसायिक उलाढालीत दोन वर्षे मागे पडलो आहोत. पुन्हा भरारी घेण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागेल. यामुळे यापुढे लॉकडाऊन करणे व्यापाऱ्यांना परवडणार नाही. 
-आनंद भारुका, अध्यक्ष, सिटीचौक, सराफा असोसिएशन

Web Title: Coronavirus In Aurangabad : During the lockdown period, trade worth Rs One thousand will be closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.