Coronavirus In Aurangabad : शहरातील चार कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 02:15 PM2020-07-14T14:15:25+5:302020-07-14T14:22:14+5:30
जिल्ह्यात सध्या ३२९१ जणांवर उपचार सुरु आहेत.
औरंगाबाद : उपचारादरम्यान चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती घाटी रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. या ४ मृत्युंमुळे आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ३६२ झाला आहे.
कोरोनाबाधित मृतांमध्ये पदमपुरा येथील ४२ वर्षीय पुरुष, आंबेडकर नगर येथील ४९ वर्षीय महिला, औरंगपुरा येथील ६५ वर्षीय वृद्ध तसेच रामनगर येथील ६५ वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. मयत चौघांना कोणतीही सहविकृती नव्हती. कोरोनाची बाधा झाल्याने तीव्र श्वसनविकार व न्युमोनियामुळे यांचा मृत्यू झाल्याचे घाटी प्रशासनाने कळवले आहे.
आज ६८ अहवाल पॉझिटिव्ह
जिल्ह्यात १०३१ स्वॅबपैकी ६८ रुग्णांचे अहवाल आज सकाळी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे आतापर्यंत ८८८२ कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी ५२२९ बरे झाले आहेत, तर ३२९१ जणांवर उपचार सुरु आहेत. यात शहर प्रवेशवेळी केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये ४ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.