४५ शिक्षकांना कोरोनाची बाधा, १६ शाळा ठेवाव्या लागल्या बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:07 AM2021-03-04T04:07:39+5:302021-03-04T04:07:39+5:30
--- शिक्षणातील अडचणी : शिक्षकांतील संक्रमणाने वाढली चिंता ---- औरंगाबाद : जिल्ह्यातील १८ जिल्हा परिषद शाळांतील ४५ शिक्षक २१ ...
---
शिक्षणातील अडचणी : शिक्षकांतील संक्रमणाने वाढली चिंता
----
औरंगाबाद : जिल्ह्यातील १८ जिल्हा परिषद शाळांतील ४५ शिक्षक २१ फेब्रुवारी ते ३ मार्चदरम्यान बाधित आढळून आले. त्यामुळे १८ पैकी १६ शाळांचे वर्ग १ ते १० दिवस बंद ठेवावे लागले. त्यातील पाच शाळा अद्यापही पुढील काही दिवसांसाठी बंद असून त्या शिक्षकांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात ५ वी ते १२ वीचे वर्ग सुरू आहेत. काेरोनाचे रुग्ण ग्रामीण भागातही वाढायला सुरुवात झाली आहे. त्यात शिक्षकांनाही बाधा झाल्याचे दिसून आल्याने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काही दिवसांसाठी शाळा बंद करण्यात आल्या. सध्या बंद असलेल्या पाच शाळा पुढील आठवडाभरात पुन्हा सुरू होतील. शिक्षक बाधित आढळून येत असल्याने शिक्षण विभागासमोरच्या अडचणीही वाढायला सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांत ममनाबाद येथे २, नागद येथे २, वाकोद येथे २, बिडकीन येथे ५, रांजणगांव दांडगा येथे २ तर इतर शाळांत प्रत्येकी एक शिक्षक बाधित आढळून आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना शाळा समित्यांनी व शाळा प्रशासनाने इतर शिक्षकांच्याही आरटीपीसीआर तपासण्या केल्या. शाळांचे निर्जंतुकीकरण, विद्यार्थी सुरक्षा उपयायोजना तर काही शाळांत विद्यार्थ्यांच्याही तपासण्या करण्यात आल्या. मात्र, त्या तपासण्या निगेटिव्ह आल्या. आतापर्यंत विद्यार्थी पाॅझिटिव्ह आल्याची नोंद जिल्ह्यात नसल्याचे शिक्षण विभागाच्या अहवालात म्हटले आहे.