Nagar Panchayat Election Result 2022: विदर्भात काँग्रेसला ‘हात’, मंत्र्यांनी राखले बालेकिल्ले; राज्यात मात्र फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 10:00 AM2022-01-20T10:00:04+5:302022-01-20T10:00:41+5:30

भंडारा जिल्हा परिषदेत काँग्रेसने जिंकल्या ५२ पैकी २१ जागा; गोंदिया जि.प.मध्ये भाजप सत्तेच्याजवळ

Nagar Panchayat Election Result 2022 congress performs well in vidarbha struggles in state | Nagar Panchayat Election Result 2022: विदर्भात काँग्रेसला ‘हात’, मंत्र्यांनी राखले बालेकिल्ले; राज्यात मात्र फटका

Nagar Panchayat Election Result 2022: विदर्भात काँग्रेसला ‘हात’, मंत्र्यांनी राखले बालेकिल्ले; राज्यात मात्र फटका

Next

- गणेश खवसे

नागपूर : ओबीसी मतदारांचा प्रचंड प्रभाव असलेल्या विदर्भात नगरपंचायतींच्या निकालात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली. बुधवारी निकाल लागलेल्या २९ नगरपंचायतींपैकी जवळपास निम्म्या काँग्रेसने जिंकल्या. विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, सुनील केदार या मंत्र्यांनी चंद्रपूर, अमरावती व नागपूरमधील बालेकिल्ले राखले; पण यापेक्षा विधानसभेची एकही जागा ताब्यात नसताना यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेसचे मोठे यश सर्वांनाच अचंबित करणारे आहे. 

अकरा जिल्ह्यांमधील एकूण ३८ नगरपंचायतींपैकी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील ९ नगरपंचायतींचा कौल गुरुवारी बाहेर येईल. बुलडाण्यात हर्षवर्धन सपकाळ यांनी मोताळा नगरपंचायत जिंकली. तथापि, राज्याचे लक्ष लागलेल्या भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत दोन्हीपैकी एकाही ठिकाणी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळविता आले नाही. गोंदियात सत्तांतर दृष्टिक्षेपात असून भाजप बहुमताच्या जवळ पोहोचला आहे. भंडाऱ्यात ५२ पैकी २१ जागा जिंकून काँग्रेस जिल्हा परिषदेतील सत्तेचा दावेदार असला तरी त्यासाठी १३ जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घ्यावी लागणार आहे.

विदर्भ- महाआघाडीची सरशी
अमरावती : अमरावती, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात १२ नगरपंचायतीमध्ये महाआघाडी सरस राहिली. अमरावती जिल्ह्यातील तिवसा नगरपंचायतीमध्ये पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी एकहाती वर्चस्व राखले, तर भातकुली नगरपंचायतीत बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वातील युवा स्वाभिमान पक्षाने १७ पैकी ९ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले. वर्धा जिल्ह्यात चार नगर पंचायतीच्या ६८ जागांसाठी निवडणूक झाली होती. यात काँग्रेसला २१ तर भाजपला २० जागा मिळाल्या आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ४ जागांवर विजय मिळविला आहे. यवतमाळ जिल्ह्यात सहा नगरपंचायतीमध्ये काँग्रेस, शिवसेनेने मुसंडी मारली. भाजप बॅकफूटवर आल्याचे चित्र आले. काँग्रेसने ३९ जागांवर विजय मिळविला आहे. २५ जागा घेऊन शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. 

मराठवाडा- वडवणी राष्ट्रवादीकडे; बीडमध्ये पंकजा मुंडेंचा बोलबाला; तीन नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा
बीड : जिल्ह्यातील पाच नगर पंचायतींपैकी आष्टी, पाटोदा, शिरूर कासारमध्ये भाजपने एकहाती विजय मिळवत सत्ता कायम राखली आहे. तर वडवणी, केजमध्ये सत्तांतर झाले आहे. वडवणीत राष्ट्रवादी व राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवारांमुळे सत्तांतर झाले आहे. केजमध्ये जनविकास परिवर्तन आघाडीने बहुमत मिळवत सत्ताधारी काँग्रेसला धक्का दिला आहे. बीडमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केज वगळता चार ठिकाणी पॅनल उभे केले होते. त्यात तीन पंचायतींत सत्ता मिळविली असून, धनंजय मुंडे गटाला धक्का बसला आहे.

केजमध्ये काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील, अशोक पाटील गटाला धक्का बसला. आष्टी, पाटोदा आणि शिरूर कासारमध्ये भाजपचे माजी 
मंत्री सुरेश धस गटाने वर्चस्व राखले. 

पश्चिम महाराष्ट्र- राष्ट्रवादीचे वर्चस्व; रोहित पाटील यांची बाजी, विश्वजित कदम यांना धक्का
संपूर्ण राज्यात लक्षवेधी ठरलेल्या सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ नगरपंचायतीत धक्कादायक निकाल लागला. शिवसेनेचे नेते, माजी मंत्री अजितराव घोरपडे, भाजपचे खासदार संजयकाका पाटील व राष्ट्रवादीच्या नेत्या अनिता सगरे-गजानन कोठावळे यांनी शेतकरी विकास आघाडी स्थापन केली होती. माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी राष्ट्रवादीचे स्वतंत्र पॅनल उभे केले. राष्ट्रवादीने १७ पैकी १० जागा जिंकत एकहाती सत्ता मिळविली. 

कडेगावात भाजपची मुसंडी
कडेगाव नगरपंचायत म्हणजे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे ‘होम ग्राउंड’. काँग्रेसकडे असलेली नगरपंचायतीची सत्ता जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या पॅनलने हस्तगत केली. 

पाटणमध्ये राज्यमंत्री देसाई यांना धक्का
सातारा जिल्ह्यातील पाटण नगरपंचायतीमध्ये गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांना धक्का देणारा निकाल लागला आहे. सत्यजित पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने १७ पैकी १५ जागांवर विजय मिळवीत सत्ता कायम ठेवली आहे तर, शिवसेनेला अवघ्या दोन जागा मिळाल्या.

सोलापूरमध्ये मोहिते-पाटील यांचेच वर्चस्व
सोलापूर जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींच्या निवडणुकीत माढा नगरपंचायत काँग्रेसकडे, माळशिरस नगरपंचायतीवर पुन्हा एकदा भाजपची सत्ता आली आहे. नव्याने स्थापन झालेल्या वैराग नगरपंचायतीत राष्ट्रवादीने सर्वाधिक जागा मिळवीत सत्ता प्राप्त केली. श्रीपूर-महाळुंग नगरपंचायतीमध्ये विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या स्थानिक आघाडीला सर्वाधिक नऊ जागा मिळाल्या आहेत. नातेपुतेमध्ये मोहिते-पाटील समर्थक बाबाराजे देशमुख गटाने ११ जागा जिंकून वर्चस्व प्रस्थापित केले आहे.पुण्यातील  देहू नगरपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता आली आहे.

अशोक चव्हाण यांचेच वर्चस्व
नांदेड : जिल्ह्यात झालेल्या तीन नगरपंचायत निवडणुकीत अर्धापूर आणि नायगावमध्ये काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली तर माहूरमध्ये काँग्रेस दुसऱ्यास्थानी परंतु निर्णायक अवस्थेत आहे. भाजप आणि शिवसेनेला मात्र या निवडणुकीत केवळ तीन जागा मिळाल्या.
तिन्ही नगर पंचायतींमध्ये पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने जोरदार यश मिळविले आहे. नायगाव नगर पंचायतीत विरोधकांचा सुपडा साफ करीत सर्वच्या सर्व १७ जागांवर काँग्रेसने बाजी मारली. तर चव्हाण यांच्या मतदारसंघातील अर्धापूर नगर पंचायतीच्या १७ जागांपैकी काँग्रेस १०, भाजप २, एमआयएम ३, राष्ट्रवादी १ तर एक जागा अपक्षाने पटकाविली. 

जालन्यात राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर
जालना जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला तीन ठिकाणी यश मिळाले असून, भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी एका नगरपंचायतीवर समाधान मानावे लागले. पालकमंत्री राजेश टोपे यांचे त्यांच्या घनसावंगी मतदारसंघातील वर्चस्व कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

लातूर जिल्ह्यात काँग्रेसला २३ जागा 
लातूर जिल्ह्यातील जळकोट, शिरूर अनंतपाळ, देवणी आणि चाकूर नगरपंचायतींच्या प्रत्येकी १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक २३ जागा जिंकल्या. राष्ट्रवादी १४, भाजपा १४, शिवसेना ६, प्रहार ६ आणि अपक्षांनी ५ जागांवर विजय मिळविला.

उत्तर महाराष्ट्र- कर्जत नगरपंचायतीत रोहित पवारांची सत्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात तीन नगरपंचायतींसाठी निवडणूक झाली. त्यामध्ये माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या यांच्या ताब्यातील कर्जत नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी वर्चस्व स्थापन केले आहे. अकोले नगरपंचायतीवर माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी आपली सत्ता राखल्याने ही नगरपंचायत भाजपच्या ताब्यात आली असून, तिथे राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. पारनेरमध्ये मात्र त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. नगराध्यक्ष हा राष्ट्रवादीचाच होईल, असा दावा आमदार नीलेश लंके यांनी केला आहे.

बोदवडमध्ये खडसेंना धक्का
भाजपची सत्ता असलेली बोदवड नगरपंचायतीत शिवसेनेने नऊ जागांवर विजय मिळवित ताब्यात घेतली. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसला सात जागा मिळाल्याने, एकनाथ खडसे यांना त्याच्याच गडामध्ये धक्का बसला आहे.

साक्री नगरपंचायतीत सत्तांतर
nधुळे जिल्ह्यातील साक्री नगरपंचायत निवडणुकीत भाजपने १७ पैकी ११ जागांवर विजय मिळवित काँग्रेसकडून पहिल्यांदाच सत्ता मिळविली. शिवसेनेला चार जागांवर तर काँग्रेस व अपक्ष यांना प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादीला एकाही जागेवर विजय मिळविता आला नाही.

कोकण- शिवसेनेची पुन्हा बाजी; देवगडमध्ये राणेंना धक्का
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील चार नगरपंचायतींपैकी वैभववाडी व दोडामार्गमध्ये भाजपाचा एकतर्फी विजय झाला आहे. देवगडमध्ये सेना- राष्ट्रवादी युती, तर कुडाळमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. कुडाळात भाजपा सर्वांत मोठा पक्ष असला तरी, शिवसेना, काँग्रेस एकत्र आल्यास सत्ता स्थापन करू शकणार आहे. कुडाळमध्ये काँग्रेस किंगमेकरच्या भूमिकेत असणार आहे. जिल्ह्यातील तिन्ही विद्यमान आमदारांना जनतेने धक्कादायक निकाल दिला आहे. कणकवलीचे भाजपा आमदार नितेश राणे यांच्या हातून देवगडची सत्ता गेली आहे, तर वैभववाडीत त्यांनी वर्चस्व कायम ठेवले 

राष्ट्रवादीबाबत बोलणाऱ्यांना चपराक
नगरपंचायत निवडणुकांचे निकाल राष्ट्रवादीच्या बाजूने लागले आहेत. या निकालाने राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील नंबर एकचा पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादीबाबत बोलणाऱ्यांना या निकालाने चांगलीच चपराक लागली आहे. पक्षासाठी सदैव काम करणाऱ्या, पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा विजय आहे. राष्ट्रवादीने राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा करुन तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला होता, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले होते. पक्षाच्या बांधणीसाठी विविध उपक्रम, आंदोलने, कार्यक्रम हाती घेतले होती. जनता दरबार उपक्रमातून जनतेची कामेही तत्परतेने सोडवण्याचा प्रयत्न केला होता, त्याचाही फायदा या निवडणुकीत पक्षाला झाला आहे.
- जयंत पाटील, अध्यक्ष, 
राष्ट्रवादी काँग्रेस

‘भाजपच नंबर १ ‘
भाजपने स्वबळावर २४ नगरपंचायती जिंकल्या आणि सहयोगी पक्षांच्या सोबतीने आणखी सहा अशा एकूण तीस नगरपंचायतींमध्ये सत्ता प्राप्त करीत आणि सर्वाधिक जागा जिंकून क्रमांक एकचा पक्ष असल्याचे सिद्ध केले. महाविकास आघाडी सरकारकडून धनशक्ती, दंडशक्ती, सत्तेचा कितीही गैरवापर झाला तरी भाजपा हा क्रमांक एकचा पक्ष होता आणि राहील.
- देवेंद्र फडणवीस, 
विधानसभेचे विरोधी पक्षनेते

...हा महाविकास आघाडीचा विजय
हा महाविकास आघाडीचा विजय आहे. महाराष्ट्रातील जनतेने सरकारच्या कामकाजावर विश्वास दाखवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाची पोचपावती दिली आहे. कुठला पक्ष क्रमांक एकचा वगैरेपेक्षा निकालांचे आकडे पाहिले जातात. मागील पाच वर्षांतील निकाल आणि आजचे निकाल पाहिले तर सर्व चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे भाजप नेत्यांनी एकदा निकाल तपासून पाहावा, मग आपोआप कळेल.  कोकण आणि शिवसेना हे जुने गणित आहे. कोकणी माणसाने शिवसेनेवर प्रेम केले आहे, हे पुन्हा दिसले. शिवसेनेवर विश्वास दाखवला.
- अनिल परब, परिवहन मंत्री

‘मुख्यमंत्रिपद सेनेकडे, पण फायदा राष्ट्रवादीचा’ 
महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे आहे पण सत्तेचा फायदा शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीच घेत असल्याचे निकालावरून दिसते. असे असले तरी आजच्या निकालात भाजपच राज्यात क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. मुख्यमंत्रिपदाची ऊब मिळाली असल्याने त्या बदल्यात पक्षाची वाट लागली तरी शिवसेनेला चालते. विचार-आचारांनी एक नसूनही महाविकास आघाडीतील पक्ष कुठे स्वतंत्र तर कुठे आघाडी करून लढले पण लोकांनी सर्वाधिक पसंती ही भाजपलाच दिली.
- चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

यह तो झांकी है : पंकजा 
‘यह तो अभी झांकी है, जिल्हा परिषद, पंचायत समिती अभी बाकी है’. आमच्या सरकारमध्ये झालेली विकासाची कामे आणि गेली अडीच वर्षे ठप्प झालेला विकास याची तुलना करून लोकांनी मतदान केले. भविष्यातील निकालाची ही नांदी आहे. हा विजय मी भाजप कार्यकर्त्यांना समर्पित करते. धनंजय मुंडे पालकमंत्री असूनही भाजपला चांगले यश मिळाले. मुळात ते काय किंवा राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील अन्य आमदार काय आपापल्या मतदार संघापलीकडे बघायला तयार नाहीत.
- पंकजा मुंडे, राष्ट्रीय सचिव, भाजप

Web Title: Nagar Panchayat Election Result 2022 congress performs well in vidarbha struggles in state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.