नागरिकांना बसणार पाणीटंचाईच्या झळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:05 AM2021-02-28T04:05:27+5:302021-02-28T04:05:27+5:30
औरंगाबाद : मराठवाड्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायतींंकडे सार्वजनिक पाणीपुरवठ्यापोटी कोट्यवधी रुपयांचे वीजबिल थकले आहे. या थकबाकीसाठी कोणत्याही क्षणी ...
औरंगाबाद : मराठवाड्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायतींंकडे सार्वजनिक पाणीपुरवठ्यापोटी कोट्यवधी रुपयांचे वीजबिल थकले आहे. या थकबाकीसाठी कोणत्याही क्षणी वीजपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली. परिणामी, नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, लातूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायत, सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या १२ हजार ७५४ वीज जोडण्यांचे तब्बल ५५०.५८ कोटी रुपये थकबाकी आहे. वीजबिलांच्या प्रचंड थकबाकीमुळे महावितरणचा आर्थिक गाडा चालविणे अशक्य आहे. या पाणीपुरवठा ग्राहकांचा थकबाकीसाठी कोणत्याही क्षणी वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. यासाठी वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
वीजबिलाच्या प्रचंड थकबाकीमुळे महावितरणला वीज खरेदी, वीज वहन, वीज यंत्रसामुग्री खरेदी, उपकेंद्र निर्मिती, देखभाल व दुरुस्ती, व्यवस्थापन खर्च, बँकांचे कर्ज व व्याजाची परतफेड दरमहा आदी खर्चाला सामोरे जावे लागते. यासाठी वीजबिलाच्या थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याशिवाय पर्याय नाही, असे महावितरणतर्फे सांगण्यात आले.
वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश
थकीत वीजबिलासाठी वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश महावितरणच्या व्यवस्थापनाने क्षेत्रीय कार्यकारी अभियंते, उपकार्यकारी अभियंते यांना दिले आहेत. नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पदाधिकारी यांनी वीजबिल भरण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.