नागभीड जंक्शनमध्ये रेल्वेच्या सुपर गाड्यांचे थांबे अजून बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2022 05:00 AM2022-01-17T05:00:00+5:302022-01-17T05:00:25+5:30
नागभीड हे पूर्व विदर्भातील महत्त्वाचे मध्यवर्ती ठिकाण असून, येथे रेल्वेचे जंक्शन आहे. येथून गोंदिया, चंद्रपूर आणि नागपूरकडे रेल्वेगाड्या रवाना होतात. हे मध्यवर्ती स्थान लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने काही महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे दिले होते. पहिला लॉकडाऊन लागेपर्यंत हे थांबे कायम होते. मात्र, लॉकडाऊन लागल्यानंतर हे थांबे बंद करण्यात आले. आश्चर्याची बाब अशी की, आताही हे थांबे बंदच आहेत.
घनश्याम नवघडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : लॉकडाऊनपासून नागभीड रेल्वे जंक्शनमध्ये एक्स्प्रेस गाड्यांचे थांबे अद्यापही बंदच आहेत. हे थांबे पूर्ववत सुरू करावेत, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
नागभीड हे पूर्व विदर्भातील महत्त्वाचे मध्यवर्ती ठिकाण असून, येथे रेल्वेचे जंक्शन आहे. येथून गोंदिया, चंद्रपूर आणि नागपूरकडे रेल्वेगाड्या रवाना होतात. हे मध्यवर्ती स्थान लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने काही महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे दिले होते.
पहिला लॉकडाऊन लागेपर्यंत हे थांबे कायम होते. मात्र, लॉकडाऊन लागल्यानंतर हे थांबे बंद करण्यात आले. आश्चर्याची बाब अशी की, आताही हे थांबे बंदच आहेत.
या संदर्भात विश्वसनीय माहितीनुसार गाडी क्र. १२८५१ बिलासपूर- चेन्नई एक्स्प्रेस आणि गाडी क्र. १२२५२ कोरबा- यशवंतपूर वैनगंगा एक्स्प्रेस या दोन एक्स्प्रेस गाड्यांचे लॉकडाऊनपूर्वी नागभीडला थांबे होते. या ठिकाणाहून चिमूर, भिवापूर, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, नागभीड व अन्य ठिकाणी एक्स्प्रेसचा थांबा असल्यामुळे प्रवासी येथून प्रवास करायचे.
मात्र, या दोन्ही एक्स्प्रेसचा थांबा सुरू न केल्याने प्रवाशांची मोठी कुचंबणा होत आहे.
नागभीडला दोन बर्थचा राखीव कोटा
- एक्स्प्रेस गाड्याचे थांबे लक्षात घेऊन रेल्वेने दोन बर्थचा राखीव कोटा मंजूर केला आहे. मात्र आता एक्स्प्रेस गाड्यांचे थांबेच बंद असल्याने या राखीव बर्थचा कोणताही उपयोग नाही.
या गाड्यांचेही हवेत थांबे
रक्षोल- हैदराबाद (गाडी क्रमांक १७००६) आणि दरभंगा- सिकंदराबाद ( गाडी क्रमांक १७००८) या दोन एक्स्प्रेस गाड्या या मार्गावरून गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्या, तरी नागभीड येथे या गाड्यांचे थांबे अद्यापही देण्यात आले नाहीत. या गाड्यांचे थांबे देण्यात यावेत, अशी मागणी असली तरी या मागणीकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. याशिवाय जसडोह (झारखंड)- गोवा आणि बुद्धगया- चेन्नई या दोन नवीन गाड्याही या मार्गाने सुरू झाल्याची माहिती आहे. या गाड्यांचे नागभीड येथे थांबे दिल्यास रेल्वेला फार मोठा प्रवासीवर्ग मिळू शकतो.