आता प्रवास व खरेदीसाठीही लसीकरण बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2021 05:00 AM2021-12-04T05:00:00+5:302021-12-04T05:00:26+5:30
प्रवासादरम्यान कोरोना बाधितापासून सहप्रवासी व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असते. मात्र कोरोनाची लस घेतल्यानंतर एकतर व्यक्तीला गंभीर संसर्ग होत नसून दवाखान्यात भर्ती होण्याची गरज पडत नाही. शिवाय लसीकरण झालेल्या व्यक्तीपासून संपर्कात आलेल्या व्यक्तीला लागण होत नसल्याचे अभ्यासातून सिद्ध झाले आहे. यामुळेच आता शासनाने लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तीलाच बसमध्ये प्रवासाची मुभा दिली आहे.
कपिल केकत
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने केलेल्या कहरानंतर आता परिस्थिती नियंत्रणात आली होती व जनजीवन पूर्वपदावर येत होते. अशातच आता ओमायक्रॉन देशात धडकला असून त्याची धास्ती अवघ्या देशातच पसरली आहे. असे असतानाच कोरोनाला मात देण्यासाठी फक्त आणी फक्त लसीकरण हेच महत्त्वाचे शस्त्र असल्याने शासनाकडून लसीकरणावर जोर दिला जात आहे. लस घेणाऱ्यांकडून पुढील व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नसते. यामुळेच शासनाकडून लसीचे दोन्ही डोस घेणे आता बंधनकारक केले जात आहे. शिवाय ज्यांनी लस घेतली नाही त्यांच्यासाठीही काही निर्बंध लावण्यात आले आहेत. राज्य शासनाकडून निर्बंध लावले जात असतानाच जिल्हा प्रशासनाकडूनही काही निर्बंध लावून कोरोनाचा धोका कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळेच आता प्रवासासह खरेदीसाठीही लसीकरण करणे गरजेचे झाले आहे.
लसीकरण असेल तरच बसचा प्रवास
- प्रवासादरम्यान कोरोना बाधितापासून सहप्रवासी व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असते. मात्र कोरोनाची लस घेतल्यानंतर एकतर व्यक्तीला गंभीर संसर्ग होत नसून दवाखान्यात भर्ती होण्याची गरज पडत नाही. शिवाय लसीकरण झालेल्या व्यक्तीपासून संपर्कात आलेल्या व्यक्तीला लागण होत नसल्याचे अभ्यासातून सिद्ध झाले आहे. यामुळेच आता शासनाने लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तीलाच बसमध्ये प्रवासाची मुभा दिली आहे. यासाठी प्रवास करताना लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र नागरिकांना बाळगणे गरजेचे झाले आहे.
रेल्वे स्थानकांवरही परवानगी नाही
- प्रवासाचे प्रमुख माध्यम रेल्वे असून नागरिकांची सोय म्हणून शासनाने गाड्या सुरू केल्या आहेत. मात्र यानंतरही शासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. याकरिता रेल्वे स्थानकांवरही नागरिकांची कोरोना लसीकरणाबाबत चौकशी केली जात आहे. प्रवासादरम्यान एखाद्या बाधिताच्या संपर्कात येऊन कित्येकांना लागण होण्याची शक्यता नाकारता येत नसून हा धोका टाळण्यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे.
...तर बाजारात साहित्यही मिळणार नाही
प्रवासादरम्यान कोरोना संसर्गाचा धोका असतानाच मॉलमध्येही नागरिकांच्या संपर्कात येऊन हा धोका टाळता येत नाही. हेच कारण आहे की, शासनाने मॉलमध्ये लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना प्रवेश देण्याचे निर्बंध लावले आहेत. दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींना मॉलमध्ये प्रवेश दिला जात आहे. म्हणजेच, खरेदीसाठीही आता लसीकरण गरजेचे झाले आहे.
रोज २०० तपासण्या
जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असून सध्या ८ ॲक्टिव्ह रूग्ण आहेत. यानंतर आता जिल्ह्यात दररोज २००-२५० तपासण्या केल्या जात आहेत. मात्र आता ओमायक्रॉनचा कहर बघता यामध्ये वाढ करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.
१२२ केंद्रांवरून लसीकरण
जिल्ह्यात सध्या १२२ केंद्रांवरून लसीकरण केले जात आहे. सुरुवातीला हीच संख्या २०० केंद्रांपर्यंत गेली होती. मात्र जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्याने आता केंद्रांची संख्या कमी करण्यात आली आहे.