मोदी सरकारला हवी Air India पासून सुटका! रोज २० कोटींचा खर्च; TATA कडे लवकरच हस्तांतरण!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 09:59 AM2021-10-18T09:59:17+5:302021-10-18T10:05:07+5:30

TATA ला Air India च्या स्वरुपात दुभती गाय मिळणार नसून, उलट अधिक पैसे खर्च करावे लागतील, असे दीपम सचिवांनी म्हटले आहे.

अनेक महिन्यांच्या प्रयत्नांनंतर अखेर Air India ची मालकी TATA समूहाकडे जाणार असल्यावर शिक्कमोर्तब झाले आहे. मात्र, Air India सारख्या आधीच हजारो कोटींचे कर्ज असलेल्या कंपनीचे संचालन TATA समूहाला सुलभ असणार नाही असे सांगितले जात आहे.

यातच प्रचंड तोट्यात असलेल्या Air India चे संचालन आता मोदी सरकारला जड जात आहे. त्यामुळे शक्य तितक्या लवकर Air India चे हस्तांतरण TATA कडे करण्यावर भर दिला जात आहे, अशी माहिती मिळाली आहे.

Air India ची हस्तांतरण प्रक्रिया लवकरात लवकर व्हावी, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. कारण एअर इंडियाच्या संचालनासाठी सरकारचे दररोज सुमारे २० कोटी रुपये खर्च होत आहेत, असे दीपम म्हणजेच गुंतवणूक तसेच सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहीन कांत पांडे यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना पांडे यांनी सांगितले की, TATA ला Air India च्या स्वरुपात दुभती गाय मिळणार नाही. याउलट TATA ला Air India संचालनासाठी जास्तीत जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत. याशिवाय टाटा आगामी वर्षापर्यंत कोणत्याही कर्मचाऱ्याला काढू शकणार नाही.

तसेच एक वर्षानंतर स्वेच्छानिवृत्तीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना कमी केले जाऊ शकते. TATA कडे Air India चे हस्तांतरण झाल्यानंतर करदात्यांच्या कोट्यवधी रुपयांची बचत होऊ शकते, असे तुहीन कांत पांडे यांनी स्पष्ट केले आहे.

आताच्या घडीला Air India वर ६१ हजार ५६२ कोटी रुपयांचे कर्ज आहे. यापैकी ७५ टक्के कर्ज टाटा समूहाकडे हस्तांतरण करण्यापूर्वी केंद्र सरकारच्या तिजोरीतून चुकते करण्यात येणार आहे. उर्वरित कर्ज TATA समूह फेडणार आहे.

दरम्यान, तब्बल ६८ वर्षांनी Air India ची TATA मध्ये घरवापसी होणार आहे. TATA समूहातील टाटा सन्सकडे एअर इंडियाचा कार्यभार एप्रिल २०२२ पर्यंत मिळेल, असे सांगितले जात आहे. एअर इंडियाची एकूण १४१ विमाने टाटाला मिळणार आहेत. मात्र, त्यापैकी केवळ ११८ विमाने उत्तमरित्या कार्यरत असल्याचे बोलले जात आहे.

TATA सन्सला २३ विमानांची दुरुस्ती करावी लागणार आहे. Air India च्या विमानांची दुरुस्ती आणि देखभाल यासाठी ३ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा सगळा खर्च टाटा सन्सला करावा लागणार आहे. कारण सरकार आता याचा खर्च करणार नसल्याचे सांगितले जात आहे.

TATA ग्रुप प्रचंड मोठा असून, टाटा सन्सला यात कोणतीही अडचण येणार नाही, असे सांगितले जात आहे. मात्र, तराही टाटा समूह Air India अधिग्रहणासाठी तब्बल १८ हजार कोटींचे कर्ज घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. टाटा समूह एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी सिंडिकेटेड कर्जाद्वारे १५ हजार कोटी रुपयांपर्यंत निधी उभारू शकतो, अशी चर्चा आहे.

TATA समूह काही परदेशी बँका आणि निवडक स्थानिक बँकांशीही चर्चा करत आहे. परदेशी बँकांमध्ये स्टँडर्ड चार्टर्ड, सिटी, ड्यूश, जेपी मॉर्गन आणि बार्कलेज यांचा समावेश आहे. TATA सन्सला लवकरच लेटर ऑफ इंटेंट मिळणे अपेक्षित असून, प्रस्तावित कर्जावर अद्याप चर्चा सुरू आहे.

TATA सन्स Air India च्या अधिग्रहणापूर्वी थोड्या कालावधीसाठी सल्लागारांची तुकडी तयार करत आहे. यात टाटा सन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, ज्यात बोर्ड सदस्य, जागतिक उड्डाण तज्ज्ञ आणि एअर इंडियाचे काही उच्च अधिकारी असतील. एअर इंडियाचा समावेश असलेल्या गटासाठी निधी योजनांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

Air India कडे आताच्या घडीला ५८ एअरबस, A320 फॅमिली विमाने, १४ बोइंग 777, २२ B787 ड्रीमलाइनर आणि AI एक्सप्रेसची २४ B737 एअरवर्थ असा विमानांचा भरगच्च ताफा आहे. हा सर्व ताफा TATA सन्सला मिळणार आहे.