रेल्वेची संख्या वाढली, थांबे मात्र वाढेनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 05:00 AM2021-07-30T05:00:00+5:302021-07-30T05:00:07+5:30
हावडा-मुंबई मार्गावर मागील तीन चार वर्षांत रेल्वे गाड्यांची संख्या बऱ्याच प्रमाणात वाढली; पण जिल्ह्यातील चार-पाच रेल्वे स्थानकांवर या रेल्वे गाड्यांना अजूनही थांबे देण्यात आले नाही. त्यामुळे प्रवाशांची मात्र प्रचंड गैरसोय होत आहे. या गाड्यांना थांबे देण्यात यावेत, यासाठी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून अनेकदा पाठपुरावा करण्यात आला; पण त्याची अजूनही दखल घेण्यात आली नसल्यामुळे समस्या कायम आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया हे प्रमुख रेल्वेस्थानक असून, लॉकडाऊनपूर्वी या मार्गावरून दरराेज ९० गाड्या धावत हाेत्या, तर सद्यस्थितीत दररोज ४७ गाड्या धावत आहेत. यात विशेष गाड्यांची संख्या अधिक असून, या गाड्या तिरोडा, आमगाव, सौंदड, सालेकसा, अर्जुनी मोरगाव या रेल्वे स्थानकांवर थांबत नसल्याने प्रवाशांना ३० ते ४० किमीचे अंतर गाठून रेल्वे पकडावी लागत आहे. हावडा-मुंबई मार्गावर मागील तीन चार वर्षांत रेल्वे गाड्यांची संख्या बऱ्याच प्रमाणात वाढली; पण जिल्ह्यातील चार-पाच रेल्वे स्थानकांवर या रेल्वे गाड्यांना अजूनही थांबे देण्यात आले नाही. त्यामुळे प्रवाशांची मात्र प्रचंड गैरसोय होत आहे. या गाड्यांना थांबे देण्यात यावेत, यासाठी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून अनेकदा पाठपुरावा करण्यात आला; पण त्याची अजूनही दखल घेण्यात आली नसल्यामुळे समस्या कायम आहे.
या ठिकाणी रेल्वे थांबे कधी मिळणार
- गोंदिया जिल्ह्यातून हावडा-मुंबई आणि गोंदिया-चांदाफोर्ट हे दोन मार्ग गेले आहे. या दोन्ही मार्गावरून जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या बरीच आहे. मात्र अजूनही बऱ्याच एक्स्प्रेस गाड्यांना तिरोडा, आमगाव, सालेकसा, सौंदड, अर्जुनी मोरगाव या रेल्वे स्थानकावर अद्यापही थांबे देण्यात आले नाही. त्यामुळे प्रवाशांची समस्या कायम आहे.
- या रेल्वे स्थानकावर विशेष गाड्यांना थांबा नसल्याने प्रवाशांना २० ते ३० किमीचा फेरा मारुन रेल्वेचा प्रवास करावा लागतो.
विशेष गाड्यांनाच थांबा नाही
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या काही मार्गावर विशेष रेल्वे गाड्याच धावत आहेत. या विशेष गाड्या असल्याने त्यांना काही रेल्वे स्थानकांवर थांबा नाही. नियमित गाड्या सुरू झाल्यानंतर थांबे वाढविण्यात येतील.
- जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग
थांबा नसल्याने आम्हाला होतोय त्रास
मी गोंदियाहून तिरोड्याला दररोज अपडाऊन करतो. मात्र गोंडवाना, आझाद हिंद, समता एक्स्प्रेस यासारख्या महत्त्वपूर्ण गाड्यांना थांबा नसल्याने आमची फार गैससोय होत असून, एसटीने प्रवास करावा लागत आहे.
- मनोज दमाहे, प्रवासी
गोंदियाहून मी अर्जुनी मोरगाव रेल्वे गाडीने प्रवास करीत होतो. मात्र कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून रेल्वे गाड्या बंद आहेत. तर काही विशेष गाड्या मार्गावरून जात असून, त्यांना थांबे नसल्याने अडचण होत आहे.
- मनीष गावंडे, प्रवासी