कोरोनाबाधितांच्या बढतीवर लागला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2021 05:00 AM2021-10-13T05:00:00+5:302021-10-13T05:00:07+5:30
आता जिल्ह्यात ४ ॲक्टिव्ह रुग्ण उरले आहेत. यामध्ये २ रुग्ण गोंदिया तालुक्यातील असून प्रत्येकी एक रुग्ण आमगाव व देवरी तालुक्यातील आहे. आता रुग्णवाढीला खंड पडला असला तरीही नागरिकांनी आतापासूनच खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण, कोरोनाची तिसरी लाट आता कुणालाही परवडणारी ठरणार नाही. याकरिता तोंडावर मास्क व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील ३-४ दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढली नसून, पडलेला हा खंड जिल्हावासीयांसाठी दिलासादायक ठरत आहे. असे असतानाच मंगळवारीही (दि. १२) जिल्ह्यात एकही नव्या बाधितांची नोंद नाही. यामुळे जिल्ह्यात आता ४ ॲक्टिव्ह रुग्ण उरले आहे. ही बाब नक्कीच दिलासादायक असली तरीही घराबाहेर बाहेर पडताना तोंडावर मास्क व शारीरिक अंतराचे पालन करणे गरजेचे आहे.
जेवढी जास्त गर्दी तेवढा जास्त कोरोनाचा प्रादुर्भाव हे आतापर्यंतच्या अभ्यासातील निष्कर्ष आहे. त्यात सध्या नवरात्र सुरू असल्याने दिवसेंदिवस नागरिकांची गर्दी वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे, मध्यंतरी कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने सर्वांचीच चिंता वाढली होती. मात्र, मागील ३-४ दिवसांपासून याला खंड पडला असून आता नवीन बाधितांची नोंद आलेली नाही. रविवारी व सोमवारी नवीन बाधितांची नोंद नसतानाच मंगळवारीही (दि. १२) सातत्याने वाढत असलेल्या रुग्णवाढीला खंड पडल्याचे दिसले. एकंदर कोरोनाबाधितांच्या बढतीवर ब्रेक लागल्याचे दिलासादायक चित्र दिसून येत आहे.
यानंतर आता जिल्ह्यात ४ ॲक्टिव्ह रुग्ण उरले आहेत. यामध्ये २ रुग्ण गोंदिया तालुक्यातील असून प्रत्येकी एक रुग्ण आमगाव व देवरी तालुक्यातील आहे. आता रुग्णवाढीला खंड पडला असला तरीही नागरिकांनी आतापासूनच खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण, कोरोनाची तिसरी लाट आता कुणालाही परवडणारी ठरणार नाही. याकरिता तोंडावर मास्क व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
११. ८९ लाख डोस लावले
- कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेने कहर केला असून, कित्येकांना त्यांच्या आप्तांपासून हिसकावून नेले आहे. यामुळे कोरोनाची भीती ज्यांच्या घरातील व्यक्ती गेली त्यांनाच जास्त चांगली समजून आली आहे. मात्र, त्यानंतरही कित्येक लोक निष्काळजीपणे वागताना दिसत असून लस घेणे टाळत आहेत. मात्र, कोरोनापासून तुमचा व कुटुंबीयांचा बचाव करण्यासाठी फक्त लस हाच एकमेव रामबाण उपाय असून, लवकरात लवकर लस घेण्याची गरज आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ११८८९०८९ डोसेस लावण्यात आले आहेत.
लसीकरणानेच धोका टळला
-दुसऱ्या लाटेने कहर केल्यानंतर लगेच ऑगस्ट महिन्यापासून तिसऱ्या लाटेबाबत तर्कवितर्क लावले जात होते. त्यानुसार ही लाट पुढे-पुढे सरकत चालली आहे. मात्र, जोमात सुरू असलेल्या लसीकरणामुळेच तिसऱ्या लाटेचा धोका आतापर्यंत निर्माण झालेला नाही. एकंदर लसीकरणच कोरोनाला हद्दपार करणार असल्याचे स्पष्ट दिसून येते. अशात कोरोनामुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी आतापासून नियमांचे पालन करूनच कोरोनाला हद्दपार करण्याची गरज आहे.