'विदर्भातील महत्त्वाची शहरे नागपूरशी मेट्रोने जोडणार'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2021 01:37 PM2021-10-25T13:37:03+5:302021-10-25T16:03:35+5:30

स्थानिक गौरी इन हॉटेल लॉन येथे आयोजित १९४५ कोटींच्या निधीतून जिल्ह्यातून जाणाऱ्या २५५ किमी महामार्ग प्रकल्पाचे लोकार्पण व भूमिपूजन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

'Metro to connect important cities of Vidarbha with Nagpur' | 'विदर्भातील महत्त्वाची शहरे नागपूरशी मेट्रोने जोडणार'

'विदर्भातील महत्त्वाची शहरे नागपूरशी मेट्रोने जोडणार'

Next
ठळक मुद्देरस्त्यांचे भक्कम जाळे१९४५ कोटी निधीतून जिल्ह्यातून जाणाऱ्या २५५ किमी महामार्ग प्रकल्पाचे लोकार्पण

अमरावती : विदर्भातील शहरे नागपूरशी मेट्रोने जोडणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री  नितीन गडकरींनी केली आहे.

विदर्भात रस्त्यांचे भक्कम जाळे निर्माण झाले. महत्वाची शहरे नागपूरशी मेट्रोने जोडणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. स्थानिक गौरी इन हॉटेल लॉन येथे आयोजित १९४५ कोटींच्या निधीतून जिल्ह्यातून जाणाऱ्या २५५ किमी महामार्ग प्रकल्पाचे लोकार्पण व भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले.

श्रीक्षेत्र बहिरम येथे एक किलोमीटर दुतर्फा सेवा रस्त्यासाठी ३५ कोटी, मोझरी येथे वळण रस्त्यासाठी ११५ कोटी निधीबरोबरच मोर्शी, वरूड, चांदूर बाजार येथील बायपास मार्गासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा  गडकरी यांनी केली. मेळघाटातील नियोजित रस्ते विकासाचे काम पूर्ण होण्यासाठी व वनविभागाच्या परवानगी आदी प्रलंबित प्रकिया पूर्ण होण्यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. अकोला ते अमरावती रस्त्याचे काम येत्या दीड वर्षात पूर्ण होईल, असे ते म्हणाले,

यावेळी महिला व बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, खासदार रामदास तडस, खासदार नवनीत राणा, माजी राज्यमंत्री तथा आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार डॉ. रणजित पाटील, आमदार सुलभा खोडके, आमदार रवि राणा, आमदार बळवंतराव वानखडे, आमदार दादाराव केचे, आमदार किरण सरनाईक, आमदार प्रताप अडसड, आमदार रामदास आंबटकर, महापौर चेतन गावंडे यांच्यासह सर्व पदाधिकारी व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

मिनी मेट्रोद्वारे विदर्भातील शहरे जोडणार

पुढील काळात मिनी मेट्रोद्वारे विदर्भातील शहरे जोडण्याचे नियोजन आहे. नागपूर येथून वडसा, बडनेरा, यवतमाळ,रामटेक, चंद्रपूर, वर्धा अशा शहरांना मिनी मेट्रोद्वारे जोडण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. आठ डब्यांच्या या मेट्रोत अत्याधुनिक सेवा उपलब्ध असतील. त्यातील इकॉनॉमी श्रेणी डब्याचे प्रवास दर बस प्रवासाइतके माफक असतील. या प्रकल्पासाठी उद्योजकांनी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले. विदर्भात अनेक रस्त्यांच्या कामांना चालना देण्यात आली आहे. नागपूर, काटोल, मोर्शी, अचलपूर, अकोट, शेगाव अशी अनेक उत्तम रस्त्यांनी शहरे जोडली जाणार आहेत.

सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार

रस्तेविकास करताना ब्रिज कम बंधारा पूर्ण करण्यात येत आहे. त्यामुळे सिंचनासाठी स्थानिक स्तरावर पाणी उपलब्ध होणार आहे. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला या कामाचा फायदा झाला आहे. विदर्भाची सर्वात मोठी समस्या सिंचनाची आहे. त्यामुळे सिंचन वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न व्हावेत.

शेतकरी हा अन्नदाता आहे. तो ऊर्जादाता झाला पाहिजे. अपारंपरिक ऊर्जानिर्मितीला चालना मिळावी. इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या उपलब्ध आहेत. त्यांचा वापर वाढावा. इथेनॉलचे पंप सुरू व्हावेत. त्यामुळे इंधनाचा एक सशक्त व परवडणारा पर्याय उभा राहील. जिल्ह्यातील संत्रा निर्यातीला चालना मिळण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. येथील कापड व संत्रा निर्यातीसाठी वर्धा येथील ड्राय पोर्ट उपयुक्त ठरेल, असेही ते म्हणाले. यावेळी सर्व पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

Web Title: 'Metro to connect important cities of Vidarbha with Nagpur'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.