प्रशासनासमोर पेच; तपासणीला जाण्याऐवजी नागरिक जाताहेत गावाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 05:02 PM2020-07-07T17:02:30+5:302020-07-07T17:13:52+5:30
तपासणी दिवशी संशयित नागरिक रात्रीतून घराला कुलूप लावून निघून जात आहेत.
औरंगाबाद : कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेले शेजारी व इतर नागरिकांचा शोध घेणे पालिकेच्या यंत्रणेला आव्हानात्मक होऊ लागले आहे. काही जण घराला कुलूप लावून रातोरात गावी निघून जात आहेत. कंटेन्मेंट क्लस्टर करण्यास नागरिक विरोध करीत आहेत. स्वॅब तपासणी करण्यासही नागरिक टाळाटाळ करीत आहेत, अशा नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णाने घरासमोर, शेजारी, आजूबाजूला राहणाऱ्यांची नावे आरोग्य पथकाला दिल्यानंतर त्या नागरिकांचा शोध घेत पीपीई कीट घालून पथक येते. नावे लिहून घेतल्यानंतर स्वॅबची तपासणी होणे गरजेचे असल्याचे सांगून पथक निघून जाते; परंतु दुसऱ्या दिवशी ते नागरिक रात्रीतून घराला कुलूप लावून निघून जात आहेत. जेथे रुग्ण सापडला त्याच्या समोर, आजू-बाजूला राहणाऱ्या नागरिकांची तपासणी करणे किं वा कोरोनाची लक्षणे आढळल्यास क्वारंटाईन करणे गरजेचे आहे; परंतु शेजाऱ्याला कोरोनाची लागण झाली की, क्वारंटाईन करण्याच्या भीतीमुळे दुसरे कुटुंब रातोरात घर सोडून दुसरीकडे निघून जात आहे.