भाजप-शिवसेना युती ही तर अडथळ्यांची शर्यत!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 03:58 AM2019-09-06T03:58:41+5:302019-09-06T03:58:53+5:30

५० विधानसभा मतदारसंघ असे आहेत की जिथे युतीमध्येच कमालीची रस्सीखेच आहे.

BJP-Shiv Sena alliance is a race for obstacles! in vidhan sabha election | भाजप-शिवसेना युती ही तर अडथळ्यांची शर्यत!

भाजप-शिवसेना युती ही तर अडथळ्यांची शर्यत!

googlenewsNext

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीचा फॉर्म्युला ठरविण्यासाठी मुंबईत बैठका सुरू झालेल्या असल्या तरी अनेक मतदारसंघांवर दोन्ही पक्ष दावेदारी करीत असल्याने युतीमध्ये तणावाची स्थिती आहे. वरचे नेते एकी असल्याचे भासवत असले तरी मतदारसंघातील वातावरण अगदी विपरित आहे. राज्यात किमान

५० विधानसभा मतदारसंघ असे आहेत की जिथे युतीमध्येच कमालीची रस्सीखेच आहे. कोणत्याही परिस्थितीत आमचा मतदारसंघ सोडू नका असा आग्रह भाजप आणि शिवसेनेचेही स्थानिक नेते ठिकठिकाणी धरताना दिसत आहेत.युतीमध्ये पूर्वापार शिवसेनेकडे असलेले पण गेल्यावेळी भाजपने जिंकलेले मतदारसंघ हे युतीतील तणावाचे मुख्य केंद्रबिंदू आहेत. २०१४ च्या विधानसभेत आपण हरलो पण अलीकडच्या लोकसभा निवडणुकीत आपल्या उमेदवारास मोठे आधिक्य होते. त्यामुळे मतदारसंघावर दावा आपलाच आहे, असे शिवसेनेचे कार्यकर्ते नेत्यांना सांगत आहेत. तर, लोकसभेचा विजय ही मोदींची पुण्याई होती, असे सांगत भाजपवाले अडून बसले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात तीन जागांवर वाद
औरंगाबाद पश्चिमची जागा (अ.जा.) सध्या शिवसेनेकडे आहे. तिथे संजय शिरसाट विद्यमान आमदार असले तरी भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी दावा ठोकला आहे. औरंगाबाद मध्य हा मतदारसंघ युतीत शिवसेनेच्या वाट्याला आला होता. २०१४ मध्ये एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील निवडून आले होते. त्यांच्याविरोधात उभे राहिलेले शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल आणि भाजपचे किशनचंद तनवाणी पराभूत झाले होते. यामुळे यावेळी यंदा भाजपने या मतदारसंघावर दावा ठोकला आहे. सिल्लोड मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडून आलेले आमदार अब्दुल सत्तार हे आता शिवसेनेत गेले आहेत. युतीमध्ये हा मतदारसंघ भाजपकडे आहे.

तुळजापूरवरून वादाचे चिन्ह
उस्मानाबाद जिल्ह्यातील दोन जागांवरुन युतीत मतभेद होण्याची चिन्ह आहेत. १९९९ पासून तुळजापूर मतदारसंघ युतीत भाजप लढवत आहे़ सेनेकडून मागच्या वेळचे उमेदवार संजय निंबाळकर यांनी तयारीही सुरु केली आहे़ माजी मंत्री आ़राणा जगजितसिंह पाटील यांच्या पक्षप्रवेशानेही भाजप-सेनेतील वादाला फोडणी मिळाली आहे़ राणा यांच्यासाठी उस्मानाबादचा मतदारसंघ सेनेकडून सोडवून घेण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे़

पाथरीच्या जागेवरून युतीत वाद
परभणी जिल्ह्यातील पाथरीच्या जागेवरून शिवसेना व भाजपत वाद होण्याची शक्यता आहे़ २०१४ च्या निवडणुकीत पाथरीतून अपक्ष उमेदवार मोहन फड यांनी शिवसेनेच्या तत्कालीन आ़ मीराताई रेंगे यांचा पराभव केला होता़ त्यानंतर आ़ फड यांनी शिवसेनेत प्रवेश केला़ शिवसेनेत खा़ बंडू जाधव यांच्याशी वाद झाल्याने त्यांनी भाजपत प्रवेश केला़ आता भाजपकडून ते पाथरीची उमेदवारी मागत आहेत.

झेंडे एकत्र, पण अनेक मतदारसंघांमध्ये संघर्ष

कागल-चंदगडला रस्सीखेच
कोल्हापूर जिल्ह्यात एकूण १० पैकी सहा आमदार शिवसेनेचे व दोन भाजपचे आहेत. या जागा युती झाली तर त्याच पक्षांकडे राहतील. उरलेले कागल व चंदगड विधानसभा मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जाणार यावरून रस्सीखेच आहे. या दोन्ही मतदारसंघात गेल्या निवडणुकीत शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर होती; परंतु शिवसेनेकडे अगोदरच जास्त जागा असल्याने या दोन्ही जागांवर भाजपने दावा सांगितला आहे. त्यापैकी कागल मतदारसंघात युतीत जास्त रस्सीखेच आहे. तिथे समरजित घाटगे यांची उमेदवारी अगोदरच भाजपने जाहीर केली आहे. शिवसेनेकडून माजी आमदार संजय घाटगे यांनी उमेदवारीचा आग्रह धरला आहे. चंदगड मतदारसंघात भाजपकडे सर्वाधिक इच्छुक आहेत. राष्ट्रवादीच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांचा भाजप प्रवेशही त्यासाठीच रखडला आहे.
नाशिकमध्ये २ मतदारसंघ महत्त्वाचे
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव- मनमाड हा मतदारसंघ गेल्यावेळी शिवसेनेचे सुहास कांदे यांनी चांगली लढत दिली होती. त्यामुळे शिवसेनेला ही जागा अनुकूल वाटत आहे. परंतु भाजपाकडून प्रथमच या मतदारसंघावर दावेदारी करण्यात येत आहे. इगतपुरी- त्र्यंबक मतदारसंघातील कॉँग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. गेल्यावेळी गावित यांनी शिवसेनेचे शिवराम झोले यांचा दहा हजार मतांनी पराभव केला होता. झोले आता भाजपाकडून दावेदार आहेत.

मुंबईत युती आमनेसामने
मुंबईतील निम्म्याहून अधिक मतदारसंघांत भाजप आणि शिवसेना पदाधिकारी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. हा तिढा अद्याप सुटलेला नसताना दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या जागांवर उमेदवार आयात करण्याचा कार्यक्रम सुरू केल्याने अस्वस्थता वाढली आहे. मागाठाणे, मालाड, भायखळा आणि वडाळा या चार जागांबाबत स्थानिक कार्यकर्ते भलतेच आक्रमक झाले आहेत. मालाडचे आमदार अस्लम शेख शिवसेना प्रवेशाच्या तयारीत असले तरी जागा सोडायची नाही, असा पवित्रा भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. मागाठाणे मतदारसंघात शिवसेनेच्या विद्यमान आमदार प्रकाश सुर्वेंच्या विरोधात प्रवीण दरेकर असा संघर्ष टिपेला पोहोचला आहे. वडाळा मतदारसंघ शिवसेनेकडे असताना भाजपने विद्यमान आमदार कालिदास कोळंबकर यांना आपल्या गोटात ओढल्याने शिवसैनिकांचे पित्त भलतेच खवळले आहे. तर शिवसेनेने सचिन अहिर यांच्या खांद्यावर भगवा दिल्यानंतर भायखळा मतदारसंघावरचा दावा सोडायला लागतो की काय, या भीतीने स्थानिक भाजप नेते चिंतेत आहेत.

नागपुरात चार जागांवर युती टोकावर
नागपूर शहर व जिल्ह्यात १२ जागा पैकी रामटेक, काटोल, सावनेर व दक्षिण नागपूर या चार मतदारसंघात भाजप व सेनेमध्ये युतीचे घोडे अडू शकते. गेल्या निवडणुकीत रामटेकमध्ये भाजपचे आ. डी. मल्लिकार्जून रेड्डी यांनी शिवसेनेचे माजी आ. आशिष जैस्वाल यांचा पराभव केला होता.

अकोल्यात सेनेचे अस्तित्व पणाला
एकूण पाच मतदारसंघ असून चार मध्ये भाजपाचे तर एका मतदारसंघात भारिप-बमसंचे आमदार आहेत. शिवसेनेने दोन मतदारसंघ मागितले आहेत. त्यापैकी बाळापूर हा एक मतदारसंघ असून येथे भाजपाचा आमदार नसल्याने हा मतदारसंघ सेनेला देण्याची मागणी आहे मात्र येथे शिवसंग्रामने दावा केला आहे. अकोट मध्ये २०१४ ला येथे भाजपचे प्रकाश भारसकाळे विजयी झाले आता हा मतदारसंघ शिवसेनला हवा आहे. तर आ.भारसकाळे हे बाहेरचे
उमेदवार आहेत असा आरोप
करीत भाजपनेच त्यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे.

रामटेक हा तसा शिवसेनेचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. काटोलमध्ये गेल्यावेळी भाजप कडून लढलेले माजी आ. आशिष देशमुख यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने आता शिवसेनेने या जागेवर दावा केला आहे.

सावनेरमध्ये गेल्यावेळी भाजपचे उमेदवार सोनबा मुसळे यांचा अर्ज छानणीत रद्द ठरला होता. त्यामुळे शिवसेनेचे विनोद जीवतोडे यांनी काँग्रेसचे आ. सुनील केदार यांना टक्कर दिली. त्यावेळी आपला उमेदवार रिंगणात नसल्यामुळे भाजपने ताकदीने शिवसेनेला मदत केली होती. यावेळी भाजप अन् सेनाही या जागेवर दावा करीत आहे.


वरोºयाची जागा कळीचा मुद्दा
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा मतदारसंघात सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर हे २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेतर्फे विधानसभा जिंकले. त्यांनी आमदारकीचा राजीनामा देवून काँग्रेसच्या तिकिटावर २०१९ ची लोकसभा निवडणूक लढली व ते निवडून आले. ही जागा आपल्याकडेच राहावी यासाठी शिवसेनेचे प्रयत्न आहेत. दुसरीकडे भाजपही या जागेवर दावा करीत आहे. माजी मंत्री संजय देवतळे यांच्यासाठी भाजपचा प्रयत्न आहे.

भंडारा विधानसभा क्षेत्रात शीतयुद्ध
भंडारा जिल्ह्यातील भंडारा, तुमसर व साकोली या तिन्ही जागांवर भाजपने हक्क सांगितला असून भंडाºयाची जागा वाट्याला यावी, यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. २०१४ मध्ये तिन्ही जागा भाजपने जिंकल्या होत्या.

Web Title: BJP-Shiv Sena alliance is a race for obstacles! in vidhan sabha election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.