अखेर शहरातील शाळांची घंटा वाजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2021 05:00 AM2021-10-05T05:00:00+5:302021-10-05T05:00:25+5:30
सालेकसा हायस्कूल सालेकसा येथे पं. स. चे गटशिक्षणाधिकारी एस. जी. वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्राचार्य एस. जे. वैद्य यांनी आलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व वर्गात बसायला सांगितले. त्यापूर्वी सर्व पालकांचे संमतीपत्र आणि शाळेत येताच सॅनिटायझर, मास्कचा वापर, हात धुण्याची सोय इत्यादीची शहनिशा करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : दीड वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेतनंतर सोमवारी (दि. ४) प्रथमच सालेकसा शहरातल्या शाळा सुरू झाल्या असून शाळेची पहिली घंटा वाजताच प्रत्येक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आणि उत्साह संचारल्याचे चित्र होते. तर विद्यार्थ्यांच्या आगमनाने शाळा आणि शहर गजबजल्या चित्र होते. हे चित्र जिल्ह्यातील सर्वच शाळांमध्ये होते.
सालेकसा हायस्कूल सालेकसा येथे पं. स. चे गटशिक्षणाधिकारी एस. जी. वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्राचार्य एस. जे. वैद्य यांनी आलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व वर्गात बसायला सांगितले. त्यापूर्वी सर्व पालकांचे संमतीपत्र आणि शाळेत येताच सॅनिटायझर, मास्कचा वापर, हात धुण्याची सोय इत्यादीची शहनिशा करण्यात आली.
यावेळी गावातील नागरिक ब्रजभूषण बैस, पर्यवेक्षक आर. बी. वैद्य व इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कोविड नियमांचा पालन करीत शाळा सुरू करण्यात आल्या. कोविड संसर्गाच्या भीतीमुळे सर्वत्र शाळा बंद होत्या. ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्या होत्या. परंतु शहरी शाळांना सुरू करण्याचा निर्णय काही झाला नव्हता. शेवटी शासनाने ४ ऑक्टोबरचा मुहूर्त काढला आणि पालकांनी समाधान व्यक्त केला. शाळा सुरू होण्यापूर्वी पालकवर्ग सतत शिक्षक वर्गाला भेटून आपल्या पाल्याची चिंता करीत. शाळा केव्हा सुरू होणार सर, मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, असे प्रश्न करीत होते. परंतु आज शाळा सुरू होताच मुलांनी दप्तर घेऊन शाळेत जाताना पाहून समाधान व्यक्त केले.
५० टक्के विद्यार्थ्यांची हजेरी
- शाळेच्या पहिल्याच दिवशी सालेकसा हायस्कूल सालेकसा, पूर्ती पब्लिक स्कूल सालेकसा, वीर बिरसा मुंडा, जानकीबाई हायस्कूल शाळेत विद्यार्थी पोहोचले असून पहिल्याच दिवशी जवळपास ५० टक्के विद्यार्थ्यांनी आपली हजेरी लावली. यात मुलींचे प्रमाण जास्त दिसून आले.
शिक्षणोत्सवाने विद्यार्थ्यांचे स्वागत
- सोमवारपासून जिल्ह्यातील ११५९ शाळा सुरू झाल्या. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन प्रवेशव्दारावरच स्वागत करण्यात आले. शाळेचा पहिला दिवस शिक्षणोत्सव म्हणून साजरा करण्यात आला. पहिल्याच दिवशी ५० टक्केच्यावर विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली होती. विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्येसुध्दा उत्साह दिसून आला.