Lockdown In Aurangabad : शंका नको; लॉकडाऊन वाढणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 06:58 PM2020-07-16T18:58:10+5:302020-07-16T19:08:47+5:30
नागरिकांनी स्वयंप्रेरणेने बंद पाळल्यामुळे कोरोनाची साखळी तुटण्यास मोठी मदत होणार आहे.
औरंगाबाद : रुग्णसंख्या वाढत असल्याने १० ते १८ जुलैपर्यंत शहर आणि वाळूज महानगरात असलेल्या लॉकडाऊनला १८ जुलैनंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्टपणे सांगितले.
सध्या असलेल्या लॉकडाऊनच्या काळातच (१८ जुलैच्या आत शक्यतो शुक्रवार आणि शनिवार) वाळूज व परिसरात रॅपीड टेस्टिंंग मोहीम राबविण्यात येईल, जेणेकरून कोरोना संशयित रुग्ण शोधले जातील, असेही चौधरी यांनी स्पष्ट केले.नागरिकांच्या सहभागामुळे लॉकडाऊन यशस्वी झाले आहे. वाढत जाणारी रुग्णसंख्या थांबविण्यासाठी आमचा सहभाग घ्या, असे नागरिकांचे मत होते. त्यातूनच १० जुलैपासून शहरात संचारबंदी लागू केली आहे. आजपर्यंत लॉकडाऊन काळात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. सर्व आस्थापना, उद्योग बंद आहेत. किराणा दुकाने बंद आहेत. शहर आणि वाळूजसह सर्व औद्योगिक वसाहती बंद आहेत. जीवनावश्यक वस्तूंची स्टिकर्स लावून फिरणाऱ्या वाहनांची वर्दळदेखील कमी आहे. पेट्रोलपंपांवर महत्त्वाच्या वाहनांविना कुणालाही इंधन दिले जात नाही. भाजीपाला, फळ मार्केट पूर्णपणे बंद आहेत. नागरिकांनी स्वयंप्रेरणेने बंद पाळल्यामुळे कोरोनाची साखळी तुटण्यास मोठी मदत होणार आहे.
इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन झाले कमी
शहरात सध्या रॅपीड अँटिजन टेस्ट सुरू आहेत. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची चाचणी करण्यात येत असून, अर्ध्या तासात चाचणीचा अहवाल प्राप्त होत असल्यामुळे बहुतांश प्रमाणात इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनचे प्रमाण कमी झाल्याचे जिल्हाधिकारी चौधरी यांनी सांगितले.
दुकाने रोज उघडण्याचा विचार
संचारबंदीचा कालावधी संपल्यानंतर नागरिकांची जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी पडू शकते. त्यासाठी सम-विषम प्रमाणात दुकाने सुरू ठेवण्याऐवजी सर्व दुकाने उघडण्याचा विचार सुरू आहे. त्याबाबत एक-दोन दिवसांत निर्णय होईल. संचारबंदीनंतर नागरिकांनी मास्क वापरणे, हात सॅनिटाईज करणे किंवा स्वच्छ धुऊनच इतरत्र स्पर्श करावा, सोशल डिस्टन्सिंंग पाळावे, असे आवाहन त्यांनी केले.
वाळूज परिसरात १४ दिवसांची संचारबंदी
वाळूज औद्योगिक वसाहतीत ४ ते १२ जुलैपर्यंत संचारबंदी लागू केली होती. त्यानंतर १० ते १८ जुलैपर्यंत संचारबंदी लागू केलेल्या संचारबंदीत वाळूज परिसराचा समावेश केला. १० ते १८ जुलैदरम्यानच्या संचारबंदीत उद्योजकांनी प्रशासनाला सहकार्य केलेले आहे. वाळूज परिसरात ४ ते १८ जुलैपर्यंत म्हणजे १४ दिवस संचारबंदीचे राहणार आहेत. यात ९ दिवस बहुतांश उद्योगांनी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाची साखळी तुटण्यासाठी १४ दिवसांचा कालावधी वाळूजसह सात ग्रामपंचायत परिसराला मिळाला आहे.