काँग्रेस वगळून आघाडी करण्याच्या मुद्द्यावरून उठला राजकीय वादंग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 10:27 AM2021-12-03T10:27:09+5:302021-12-03T10:27:35+5:30

Maharashtra Politics: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या मुंबई दौऱ्यात काँग्रेसवगळून भाजपविरोधी आघाडी उभारण्यासंदर्भात केलेल्या विधानांवर गुरुवारीही काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

Political controversy arose over the issue of non-Congress leadership | काँग्रेस वगळून आघाडी करण्याच्या मुद्द्यावरून उठला राजकीय वादंग

काँग्रेस वगळून आघाडी करण्याच्या मुद्द्यावरून उठला राजकीय वादंग

googlenewsNext

 मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या मुंबई दौऱ्यात काँग्रेसवगळून भाजपविरोधी आघाडी उभारण्यासंदर्भात केलेल्या विधानांवर गुरुवारीही काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. काँग्रेसला वगळून आघाडीचा प्रयत्न भाजपलाच मदत करणारा असल्याचे सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या प्रयत्नांना फटकारले आहे. तर, काँग्रेसची चाल हत्तीसारखी सरळ आणि थेट आहे. उंट आणि घोड्यासारखी नाही, अशा शब्दात काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी टीका केली आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा एक व्हिडीओ ट्विट करून ममता बॅनर्जींवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

काँग्रेसची चाल हत्तीसारखी सरळ, थेट - अशोक चव्हाण
काँग्रेसची चाल हत्तीसारखी सरळ आणि थेट आहे. अलीकडे काँग्रेसबाबत काही मंडळींना झालेल्या गैरसमजाच्या पार्श्वभूमीवर दिवंगत विलासराव देशमुख यांच्या या विधानाची सहज आठवणी झाली, असे सांगत कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी सध्याच्या राजकीय घडामाेडींवर भाष्य केले. आपल्या ट्विटमध्ये अशोक चव्हाण यांनी विलासराव देशमुख यांच्या भाषणाची क्लिपही जोडली. यात काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना विलासरावांनी आपल्या खास शैलीत काँग्रेस विरोधकांचा समाचार घेतला होता. ‘मला वाटते काँग्रेसची ही धडक जी आहे ना, ती थेट आहे, सरळ आहे. हत्ती कसा सरळ चालतो, आपली चाल हत्तीसारखी सरळ आहे. या मार्गावर जे येतील त्यांना बरोबर घेऊन, जे येणार नाहीत त्यांना बाजूला सोडून, ही काँग्रेसची चाल आहे. आपले काही उंटासारखे तिरके जात नाही किंवा घोड्यासारखे अडीच घर चालत नाही. जो विचार आहे तो गरिबांचा विचार आहे, सर्व जातीधर्मांना बरोबर घेऊन जाणारा विचार आहे.  एवढे मोठे पाठबळ तुमच्यासोबत असताना, एवढी मोठी वैचारिक शिदोरी तुमच्याबरोबर असताना कुणाला घाबरण्याचे काही कारण नाही. उजळ माथ्याने जनतेसमोर जा आणि त्यांना सांगा की, हे आम्ही केले आहे आणि जे राहिले तेही आम्हीच करणार. दुसरा कोणीही करू शकणार नाही, अशा शब्दांत विलासराव कार्यकर्त्यांना संबोधित करत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

एक सामूहिक नेतृत्व देण्याचे काम पवार करत आहेत - मलिक
आम्ही ममता बॅनर्जींसोबत राहणार की कॉंग्रेससोबत याची चिंता काहींना वाटते आहे. पण, या राज्यात शिवसेना आणि काँग्रेस हे दोन पक्ष एकत्र येतील असे कधी कुणी स्वप्नातही पाहिले नव्हते. तशीच परिस्थिती या देशात होणार आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी बाजू मांडली. बरेच लोक आहेत जे कधी सोबत येणार याची चर्चा होत नाही, परंतु या सगळ्यांची मोट बांधण्याचे काम पवार करतील. कुणालाही याच्यातून बाहेर काढून ही आघाडी होणार नाही. सगळ्यांचा समावेश करायचा आहे यादृष्टीने ते काम करत आहेत, असे मलिक यांनी सांगितले.
      या देशात विविध प्रश्न निर्माण झाल्यावर ज्या पद्धतीने यूपीएच्या बैठका झाल्या पाहिजे होत्या, त्या झाल्या नाहीत ही सत्य परिस्थिती आहे. आम्हाला या देशात ममता बॅनर्जी, टीआरएस, सपा, आरजेडी, दक्षिणेतील पक्ष या सर्वांची मोट बांधायची आहे. कॉंग्रेससह एक नवीन आघाडी तयार करायची आहे. सामूहिक नेतृत्व निर्माण करुन ही आघाडी काम करेल, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. ममता बॅनर्जी या दोन दिवसांच्या दौ-यावर असताना त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी देशात मोदी सरकारविरोधात असंतोषाचे वातावरण असून सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन एक पर्याय देण्याची गरज असल्याचे मत मांडले. त्यावर पवार यांनी आम्ही सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केल्याचे मलिक म्हणाले.

आघाडीच्या प्रयत्नांना शरद पवार यांची साथ - देवेंद्र फडणवीस
काँग्रेसला वगळून देशात आघाडी निर्माण करण्याचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा प्रयत्न आहे. त्याला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची साथ आहे, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात काही भेटीगाठी घेतल्या. उद्योगांना आकृष्ट करणे हा ममता बॅनर्जी यांचा बहाणा आहे. या दौऱ्याचा मूळ अजेंडा राजकीय होता. भाजपविरोधी सर्व पक्षांना एकत्र घेऊन लढायचे, असे म्हणत असताना पवार अंडरलाईन स्टेटमेंट करतात. त्यावेळी त्यांना काँग्रेस सोडून सर्व एकत्र या, असे म्हणायचे असते. ममता या थेट बोलणाऱ्या आहेत तर पवार हे ‘बिटवीन द लाईन’ बोलणारे आहेत.  दोघांना काँग्रेसला बाजूला ठेवत इतरांना सोबत घ्यायचे आहे. ममता गोव्यात आणि पूर्वोत्तर राज्यात निवडणुका लढवत आहेत. काँग्रेस हा मुख्य विरोधी पक्ष नाही तर आम्ही आहोत, हे त्यांना सांगायचे आहे. काँग्रेस संपली आहे. आम्हीच खरी काँग्रेस आहोत, ही त्यांच्या पक्षाची भूमिका आहे. या सर्व मतांना पवारांचे समर्थन आहे. पहिल्या दिवसापासून हे पवारांचे मत आहे. फक्त राज्यातील परिस्थिती अनुकूल नसल्याने त्यांना काँग्रेसला सोबत घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. ममता, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या भेटीबाबत फडणवीस म्हणाले कितीही गुप्त भेटी घेतल्या तरी २०२४ ला मोदींच्या नेतृत्वातच सरकार येणार आहे. 

२०१९ लाही असेच प्रयत्न झाले - नाना पटोले
भाजपसारख्या विभाजनवादी शक्तीविरोधात एकत्रित लढा देणे, ही काळाची गरज असताना काही लोक भाजपला मदत होईल अशी भूमिका घेत आहेत. २०१९ च्या निवडणुकीतही असाच प्रयत्न केला गेला ज्याचा फायदा भाजपलाच झाला होता. विरोधकांना सरकारी यंत्रणांची भीती दाखविली जात आहे. काही पक्ष त्याला बळी पडून बोटचेपी भूमिका घेत आहेत. काँग्रेस नेतृत्व सातत्याने केंद्र सरकारच्या अत्याचाराविरोधात आक्रमकपणे लढा देत आहेत. शेतकरी, कामगार, दलित, पीडित समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. अहंकारी सत्तेलाही सामान्य जनतेच्या शक्तीसमोर हार मानावी लागते हे शेतकरी आंदोलनाने दाखवून दिले आहे. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे तीन काळे कृषी कायदे १२ मिनिटांत रद्द करावे लागले. महागाई, शेतकरी, कामगारांचे व जनतेच्या प्रश्नावर काँग्रेसचा संघर्ष सुरु आहे व यापुढेही तो सुरुच राहील. जनतेचा काँग्रेसवर विश्वास आहे आणि तो दिवसेंदिवस आणखी वाढत आहे. काँग्रेसला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही. काँग्रेस भाजपच्या विरोधात ठाम उभा आहे आणि इतर पक्ष कोणाबरोबर आहेत, हे आता देशातील जनतेला माहिती झाले पाहिजे. काँग्रेसला वगळून अनेक आघाड्या करण्याचे प्रयत्न केले गेले. त्याचा फायदा कोणाला होतो हेही कळले असून काँग्रेस यापुढेही भाजपला तोंड देण्यास समर्थ आहे असेही नाना पटोले म्हणाले. 

Web Title: Political controversy arose over the issue of non-Congress leadership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.