IMPS ट्रान्झॅक्शनचं लिमिट वाढलं; आता रोज करू शकता पाच लाखांपर्यंतची देवाणघेवाण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 02:59 PM2021-10-08T14:59:26+5:302021-10-08T15:06:39+5:30

IMPS Transaction Limit Increaded : ट्रान्झॅक्शनची मर्यादा वाढल्यानं सामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता.

यापूर्वी आयएमपीएसची मर्यादा दोन लाख रूपये होती. परंतु आता ती वाढवून पाच लाख रूपये करण्यात आली आहे. आयएमपीएसद्वारे रक्कम देण्याची मर्यादा वाढवल्यामुळे आता ग्राहकांना २ लाखांवरील मोठे व्यवहार तात्कार आणि सहजरित्या करणं सोपं होणार आहे.

RBI ने तात्काळ पेमेंट सर्व्हिस (IMPS) द्वारे व्यवहाराची मर्यादा 2 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये केली आहे. आर्थिक धोरण आढावा बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikant Das) यांनी यासंदर्भातील माहिती दिली.

आयएमपीएसची मर्यादा वाढवल्यामुळे ग्राहकांना अधिक रक्कम हस्तांतरीत करण्यास मदत मिळणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या (Resrve Bank Of india) द्विमासिक पतधोरण आढावा समितीच्या तीन दिवसीय बैठकीची सांगता झाली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत व्याजदर जैसे थे ठेवण्यावर निर्णय घेण्यात आला.

IMPS ही एक मोफत सेवा आहे, ज्याद्वारे ग्राहक आपल्या खात्यातून दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकतात. आयएमपीएसचं महत्त्व पाहता त्याचं लिमिट प्रति ट्रान्झॅक्शन २ लाखांवरून पाच लाख करण्याचा प्रस्ताव असल्याचं दास यांनी सांगितलं. १५ मार्च २०२१ पासून इनवार्ड आयएमपीएस ट्रान्सफरवर कोणतंही शुल्क आकारलं जात नाही.

आयएमपीएस एक तात्काळ पैसे पोहोचवण्यासाठी वापरली जाणारी इंटरबँक इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर सेवा आहे. मोबाईलद्वारे या सेवांचा लाभ घेता येतो. यासाठी एटीएम, इंटरनेट बँकिंग आदी माध्यमांचाही वापर केला जाऊ शकतो.

देशात ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून कधीही कुठेही पैसे पाठवता येणं शक्य आहे. ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करण्याचे तीन प्रकार आहेत. यामध्ये IMPS, NEFT आणि RTGS यांचा समावेश होतो.

आयएमपीएस एक रियल टाईम पेमेंट सर्व्हिस आहे. ज्याच्या माध्यमातून कोणत्याही खातेधारकाला कधीही केव्हाही पैसे पाठवता येणं शक्य आहे. यामध्ये पैसे कोणत्याही वेळी पाठवता येऊ शकतात. तुम्ही आठवड्याचे सातही दिवस २४ तास केव्हाही आयएमपीएसद्वारे पैसे पाठवू शकता.

रिझर्व्ह बँकेनं सलग आठव्यांदा व्याज दरात कोणतेही बदल केलेले नाही. रेपो दर ४ टक्क्यांवर आणि रिव्हर्स रेपो दर ३.३५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आले आहेत. यामुळे सामान्यांच्या ईएमआय (EMI) मध्ये तुर्तास कोणताही बदल होणार नाही.

"रिझर्व्ह बँक वाढीसाठी शाश्वत आधारावर पुनरुज्जीवनासाठी मवाळ भूमिका कायम ठेवेल. कोरोना महासाथीच्या सुरुवातीपासूनच रिझर्व्ह बँकेनं १०० पेक्षा अधिक उपाययोजना केल्या. महागाईची स्थिती अपेक्षेपेक्षा अनुकुल आहे," असं दास यांनी स्पष्ट केलं.

तसंच आर्थिक क्रियाही हळूहळू वाढत मार्गांवर येत आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने २०२१-२२ साठी ९.५ टक्के जीडीपी वाढीचा अंदाज कायम ठेवला आहे," असं दास यांनी सांगितलं.

Read in English