कोरोनातून सुटका होताच उडणार लग्नांचा धूमधडाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2021 05:00 AM2021-10-25T05:00:00+5:302021-10-25T05:00:07+5:30
गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे विवाह समारंभांवर प्रशासनाने विविध बंधने घातली होती. लग्नांचे तब्बल दोन हंगाम वाया गेले. त्यामुळे वय झालेल्या उपवर मुला-मुलींना लग्न जुळल्यानंतरही प्रत्यक्ष विवाहासाठी ताटकळत रहावे लागले. आता मात्र प्रशासनाने विवाह समारंभांवरील निर्बंध जवळपास हटविले आहे. त्यामुळे तुळशी विवाह होताच विवाह समारंभांचा धूमधडाका उडविला जाणार आहे. त्यासाठी आतापासूनच तारखा निश्चित करुन मंगल कार्यालयांचे बुकिंग केले जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोनाचे संकट आता जवळपास निवळले आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांनी लग्न समारंभ उरकण्यासाठी घाई सुरू केली आहे. १५ नोव्हेंबरला तुळशी विवाह आटोपताच लग्न समारंभांच्या तारखा निश्चित केल्या जात आहे. दरवर्षी फेब्रुवारी, मार्चमध्ये होणारी विवाह समारंभांची गर्दी यंदा नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्येच पहायला मिळणार आहे.
गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे विवाह समारंभांवर प्रशासनाने विविध बंधने घातली होती. लग्नांचे तब्बल दोन हंगाम वाया गेले. त्यामुळे वय झालेल्या उपवर मुला-मुलींना लग्न जुळल्यानंतरही प्रत्यक्ष विवाहासाठी ताटकळत रहावे लागले. आता मात्र प्रशासनाने विवाह समारंभांवरील निर्बंध जवळपास हटविले आहे. त्यामुळे तुळशी विवाह होताच विवाह समारंभांचा धूमधडाका उडविला जाणार आहे. त्यासाठी आतापासूनच तारखा निश्चित करुन मंगल कार्यालयांचे बुकिंग केले जाणार आहे. दिवाळीच्या चकल्या संपताच विवाहांचे लाडू फुटणार आहे.
मंगल कार्यालय बुक केले का ?
- कोरोनाच्या निर्बंधातून सूट मिळताच अनेकांनी एकाच वेळी लग्न समारंभ उरकण्याची घाई सुरू केली आहे. त्यामुळे मंगल कार्यालये तडकाफडकी बुक करण्याकडे कल वाढला आहे. यवतमाळ शहरासह पांढरकवडा, पुसद, वणी, आर्णीत बुकिंग वाढल्याच्या व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया आहे.
जानेवारी, फेब्रुवारीमध्येच समारंभांना खरा रंग
- कोरोना संकटानंतर नोव्हेंबर, डिसेंबरमध्येच अनेकांनी लगीन घाई सुरू केली असली तरी लग्न समारंभांची खरी गर्दी जानेवारी, फेब्रुवारीमध्येच दिसणार आहे. या काळात मुला-मुलींच्या शिक्षणाची गडबड बऱ्यापैकी कमी झालेली असते. शेतीच्या कामांनाही उतार पडलेला असतो. म्हणून हे महिने निवडले जातात.
तसे पाहिल्यास यंदा लग्नाचे मुहूर्त कमी आहे. मात्र तुळसी विवाहानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये काही लग्न मुहूर्त आहेत. कोरोनामुळे थांबलेले विवाह या काळात करणे सोईचे ठरणार आहे. अनेक जण या काळातील मुहूर्तांबाबत विचारणाही करीत आहे.
- मधुकर लोहकरे, ज्योतिषी