कोरोना कमी झाला, तरी शहरात ऑनलाईनच शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:27 AM2021-09-18T04:27:19+5:302021-09-18T04:27:19+5:30
ज्या गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. तेथील पालकांची संमती अथवा हमी पत्रे घेऊन आठवी ते बारावीचे वर्ग सुरू ...
ज्या गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. तेथील पालकांची संमती अथवा हमी पत्रे घेऊन आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याची सूचना शाळांना करण्यात आली. त्यानुसार गेल्या अडीच महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील माध्यमिक शाळांमधील वर्ग सुरू झाले. टप्प्या-टप्प्याने वर्ग सुरू करणाऱ्या शाळांची संख्या वाढली. ग्रामीण भागात शाळा सुरू झाल्या असल्या, तरी अद्याप शहरातील बहुतांश शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. गेल्या महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता शहरातील शाळांमधील वर्ग सुरू करण्याची आग्रही मागणी पालकांनी केली आहे. त्यानुसार आणि पालकांनी संमतीपत्रे दिलेल्या शाळांनी नववी, दहावीचे वर्ग ऑफलाईन सुरू केले आहेत. सरसकट इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग भरविण्याची मागणी पालकांतून जोर धरू लागली आहे.
प्रतिक्रिया
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे समूह अध्यापन आणि ऑनलाईन पद्धतीने शहरातील शाळांतून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. ऑफलाईन पद्धतीने शिक्षण देण्याबाबत अद्याप राज्य शासनाकडून आदेश, परवानगी मिळालेली नाही.
-एस. के. यादव, प्रशासन अधिकारी, प्राथमिक शिक्षण समिती महापालिका.
शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने वर्ग प्रत्यक्षात भरविण्यात यावी, अशी आग्रही मागणी पालकांनी केली आहे. त्यांचा रेटा वाढल्याने आम्ही नववी, दहावीचे वर्ग कोरोनाच्या नियमांचे पालन करत ऑफलाईन पद्धतीने सुरू केले आहेत.
- प्रभाकर हेरवाडे, सचिव, दि. न्यू एज्युकेशन सोसायटी